म. टा. प्रतिनिधी, ठाणे
ठाण्यातील खारकरआळी, कडवागल्ली, महागिरी, जांभळीनाका व त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाले वाढले असून बेशिस्त वाहनचालकांमुळे या भागातील नागरिकांची मोठी अडचण सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते स्टेशन या रस्त्यावरील टीएमटी बसमुळे वाहतूककोंडी निर्माण होत आहे. याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १० जून रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळात येथील गणपती मंदिरासमोर स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यावेळी नागरिक आपल्या त्रासाला वाचा फोडणार आहेत. अनधिकृत फेरीवाले आणि बेशिस्त पद्धतीने विरूध्द दिशेने वाहने चालवणारे दुचाकीस्वार, रिक्षा चालक यांचा त्रास दिवसेदिंवस वाढत आहे. टीएमटी आणि एसटीच्या रहदारीमुळे नागरिकांची कोंडी होत असून स्थानिक पादचाऱ्यांना किमान रस्ताही चालण्यासाठी मिळत नाही. आजूबाजूच्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. लहान अपघात नित्याचे होत असून या भागात कारवाई करण्यास अतिक्रमण विभाग आणि वाहतूक विभागही फिरकत नाही. त्यामुळे या सगळ्यांचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले आहे.