अ‍ॅपशहर

मंदिरे कुणाची मक्तेदारी असू नयेत!

'शबरीमला मंदिराच्या प्रवेशावरून सध्या वादंग सुरू आहे. मात्र, सोवळओवळे, पावित्र्य या साऱ्या माणसांनी घडविलेल्या गोष्टी आहेत. देवही माणसांनी घडविले. यामुळे धर्मसत्ता काय देणार? काय शिकविणार? बायकांनासह सर्वांना देवदर्शन, मंदिरे खुली असावीत, ती कोणाची मक्तेदारी असू नये,'...

Maharashtra Times 19 Nov 2018, 2:05 am
९२व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांचे खडे बोल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम temples should not be monopoly
मंदिरे कुणाची मक्तेदारी असू नयेत!


म. टा. प्रतिनिधी, ठाणे

'शबरीमला मंदिराच्या प्रवेशावरून सध्या वादंग सुरू आहे. मात्र, सोवळओवळे, पावित्र्य या साऱ्या माणसांनी घडविलेल्या गोष्टी आहेत. देवही माणसांनी घडविले. यामुळे धर्मसत्ता काय देणार? काय शिकविणार? बायकांनासह सर्वांना देवदर्शन, मंदिरे खुली असावीत, ती कोणाची मक्तेदारी असू नये,' असे परखड मत ९२व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.

मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे यांच्यावतीने ढेरे यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 'महाराष्ट्रात प्राचीन काळापासून बायका अभिव्यक्त होत होत्या. आधुनिक युगातही स्त्री मुक्तीचे अनेक प्रयोग होत आहेत. पण पूर्वीही संत कवयित्रींनी असे प्रयोग केले आहेत, याचे भान राहायला हवे. जेव्हा राजाने जबरदस्तीने लग्न लावायचा प्रयत्न केला तेव्हा त्यावेळच्या संत कवयित्रीने भर दरबारात आपली सर्व वस्त्रे उतरवून टाकली होती. ही शरीररूपी चामड्याची पिशवी हवी तर घे, पण माझ मन नाही मिळणार, असे ठणकावून आपला सन्मान जपला. त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष नाही तर समन्वय असायला हवा,' असे त्या म्हणाल्या.

विठ्ठलाचे अनेक संप्रदाय झाले असले तरी या संप्रदायात कधीही धार्मिक संघर्ष झाला नाही. रक्तपात झाला नाही, उलट त्यांनी महाराष्ट्र बांधला. आजही या विठ्ठलाच्या दिंडीसाठी व्यवसाय, ताण सोडून २ ते ३ लाख माणसे वारीला जातात. मी ही या वारीत चालली आहे. कलावंत, साहित्यिकही या दिंडीत आपापला विठ्ठल शोधतात. हा एक चमत्कार आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक घर हे ग्रंथघर व्हायला हवे आणि ही ग्रंथघरे वाढली पाहिजेत. अशी घरे महाराष्ट्राच्या ज्ञानव्यवहाराच्या केंद्रस्थानी यावीत, ही ज्ञानपरंपरा पुढे नेण्याची जबाबदारी वाचक, रसिकांचीही आहे, असे ढेरे म्हणाल्या.

माझी करंगळी निमित्त व्हावे

नवीन पद्धतीने अध्यक्षपदी झालेली निवड हे साहित्यक्षेत्रातील मोठ्या बदलाचे लक्षण आहे. संमेलन अध्यक्ष पदापासून खूप मोठी माणस दूर राहिली, अशी खंत जाणत्या मराठी माणसांची आहे. माझी निवड ही इंदिराबाईंची (इंदिरा संत ) भरपाई असल्याचही बोलले जातेय. पण हे बदल एका रात्रीत होत नाहीत, ते हळूहळू होत जातात. साहित्य संमेलन हा लोकोत्सव व्हावा, या संमेलन गोवर्धन उचलताना लोकांच्या काठ्या लागाव्यात आणि माझी करंगळी याचे निमित्त व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज फार पूर्वीपासून समाज उठवित आहे. ज्ञानोबा, तुकाराम यांनी केलेले बंड हे मराठी भाषेची एक नवी ज्ञानव्यवस्था आहे. भाषीय पातळीवरील, संप्रदायाच्या भिंतींवरील, जातीव्यवस्था, स्रीबाबत झालेले बंड ही याची उदाहरणे आहेत, असे त्या म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज