मरगळ झटकून गोविंदांची जोमाने सरावाला सुरवात
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
मागील चार वर्षांपासून सतत न्यायालयाच्या अटी-शर्तींमुळे संभ्रमात सापडलेल्या गोविंदा पथकांमध्ये सोमवारी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर थरांचा ‘थरथराट’ पुन्हा सुरू होण्याबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख गोविंदा पथकांनी जोमाने सरावास सुरुवात केली आहे. उत्सव अवघ्या नऊ दिवसांवर आला असताना पूर्ण तयारीसह मैदानात उतरण्याचे आव्हान या गोविंदा पथकांसमोर असेल.
दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील गोविंदा पथके दरवर्षी दहीहंडी उत्सवाच्या तोंडावर येणाऱ्या न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसत होती. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तीन ते चार वर्षांपूर्वी दहीहंडीची कमाल उंची २० फूटच असावी. तसेच, गोविंदांचे किमान वय १८ असावे, असे गोविंदा पथकांसह आयोजकांना बजावले होते. त्यामुळे अनेक पथकांनी या उत्सवातून थेट माघार घेण्याचा पर्याय स्वीकारला होता. त्यातच दहीहंडी उत्सव आयोजकांनीही या सणाच्या आयोजनातून ‘खांदा’ काढून घेतल्याने गोविंदांच्या उत्साहावर ‘पाणी’ फेरले होते. शहरातील काही गोविंदा पथके दरवर्षी न्यायालयाचा निकाल येण्याआधीपासूनच कसून सरावाला सुरुवात करत होती. मात्र यंदाही दहीहंडी उत्सवावर अनिश्चिततेचे ढग कायम असल्याने काही पथकांनी उत्सव अवघ्या १५ दिवसांवर आला असतानाही सरावास सुरुवातच केली नव्हती. हंड्यांच्या उंचीबाबत गोविंदा पथकांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी देताना हे प्रकरण पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केले होते. उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवरील निर्बंध हटवून गोविंदा पथकांत सहभागी होण्याचे वयही १८ वरून १४ केले आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील गोविंदा पथकांनी या निर्णयानंतर सरावाचा नारळ वाढवत थर रचण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकार गोविंदा पथकांसमवेत असून सुरक्षेच्या उपाययोजना निश्चितच बाळगल्या जातील. तसेच, गोपाळकाला पूर्वीच्या उत्साहात साजरा होईल, अशी आशा ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचे अध्यक्ष तथा दहीहंडी समन्वय समितीचे सदस्य राकेश यादव यांनी ‘मटा’ला सांगितले.
००००
दहीहंडी उत्सवावर न्यायालयाच्या निकालाने सतत अनिश्चिततेचे ढग दाटून येत होते. यामध्ये मुलांकडून सराव शिबिरांकडे पाठ फिरवण्याचे प्रकार वाढले होते. मात्र, उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर पुन्हा एकदा गोविंदा पथकांमधील मुलांकडून सरावास हजेरी लावली जाईल.
- नीलेश वैती, जतन गोविंदा उत्सव पथक, वैतीवाडी
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
मागील चार वर्षांपासून सतत न्यायालयाच्या अटी-शर्तींमुळे संभ्रमात सापडलेल्या गोविंदा पथकांमध्ये सोमवारी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर थरांचा ‘थरथराट’ पुन्हा सुरू होण्याबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख गोविंदा पथकांनी जोमाने सरावास सुरुवात केली आहे. उत्सव अवघ्या नऊ दिवसांवर आला असताना पूर्ण तयारीसह मैदानात उतरण्याचे आव्हान या गोविंदा पथकांसमोर असेल.
दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील गोविंदा पथके दरवर्षी दहीहंडी उत्सवाच्या तोंडावर येणाऱ्या न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसत होती. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तीन ते चार वर्षांपूर्वी दहीहंडीची कमाल उंची २० फूटच असावी. तसेच, गोविंदांचे किमान वय १८ असावे, असे गोविंदा पथकांसह आयोजकांना बजावले होते. त्यामुळे अनेक पथकांनी या उत्सवातून थेट माघार घेण्याचा पर्याय स्वीकारला होता. त्यातच दहीहंडी उत्सव आयोजकांनीही या सणाच्या आयोजनातून ‘खांदा’ काढून घेतल्याने गोविंदांच्या उत्साहावर ‘पाणी’ फेरले होते. शहरातील काही गोविंदा पथके दरवर्षी न्यायालयाचा निकाल येण्याआधीपासूनच कसून सरावाला सुरुवात करत होती. मात्र यंदाही दहीहंडी उत्सवावर अनिश्चिततेचे ढग कायम असल्याने काही पथकांनी उत्सव अवघ्या १५ दिवसांवर आला असतानाही सरावास सुरुवातच केली नव्हती. हंड्यांच्या उंचीबाबत गोविंदा पथकांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी देताना हे प्रकरण पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केले होते. उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवरील निर्बंध हटवून गोविंदा पथकांत सहभागी होण्याचे वयही १८ वरून १४ केले आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील गोविंदा पथकांनी या निर्णयानंतर सरावाचा नारळ वाढवत थर रचण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकार गोविंदा पथकांसमवेत असून सुरक्षेच्या उपाययोजना निश्चितच बाळगल्या जातील. तसेच, गोपाळकाला पूर्वीच्या उत्साहात साजरा होईल, अशी आशा ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचे अध्यक्ष तथा दहीहंडी समन्वय समितीचे सदस्य राकेश यादव यांनी ‘मटा’ला सांगितले.
००००
दहीहंडी उत्सवावर न्यायालयाच्या निकालाने सतत अनिश्चिततेचे ढग दाटून येत होते. यामध्ये मुलांकडून सराव शिबिरांकडे पाठ फिरवण्याचे प्रकार वाढले होते. मात्र, उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर पुन्हा एकदा गोविंदा पथकांमधील मुलांकडून सरावास हजेरी लावली जाईल.
- नीलेश वैती, जतन गोविंदा उत्सव पथक, वैतीवाडी