खड्डेमुक्ती कधी?
ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवरात्रीपूर्वी जिल्ह्यातील खड्डे बुजवण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना लोकप्रतिनिधींकडून देण्यात आले होते. परंतु दहा दिवसांमध्ये यामध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. ठाणे शहरासह जिल्ह्यातील सर्व महामार्गांवर मोठे खड्डे कायम आहेत. विशेष म्हणजे खड्डे बुजवण्यासाठी वापरलेल्या निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे खड्ड्यातील खडी रस्त्यावर पसरली असून त्यामुळे अपघातांची भीती आहे. यामध्ये दुचाकीस्वारांना मोठा फटका बसत आहे. शिवाय उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी रस्त्यावरील खड्डे पाहणीचा निर्णय घेतला. परंतु केवळ खड्डे बुजवण्याची पाहणी न करता ते पुन्हा उद्भवणार नाहीत यासाठी कायमस्वरूपी उपाय करण्याचीही गरज आहे. प्रशासनाकडून वारंवार प्रयत्न होत असले तरी खड्ड्यांपासून रस्त्यांची मुक्तता होत नाही. प्रशासनाकडून यासाठी व्यापक प्रयत्न करून ठाणेकरांना किमान या खड्ड्यांच्या संकटातून सोडवावे. इतर प्राधिकरणांनीही खड्डेमुक्तीसाठी प्रयत्न करून चांगल्या रस्त्यांच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा खड्ड्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये संताप पसरू शकतो, याची दखल संबंधितांनी वेळीच घेतलेली बरी.