म. टा. प्रतिनिधी, ठाणे
मतदारांना जागृत करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शुक्रवारी ठाणे शहरामध्ये मतदान जनजागृती दौडीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या शेकडो धावपटूंनी या उपक्रमात सहभागी होऊन मतदान जागृती केली. यावेळी मतदान जागृतीसाठी धावपटूंनी वेगवेगळे संदेश असणारे फलक, कपडे आणि वेशभूषेचा आधार घेतला होता. मतदारांनी २९ एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले आहे. स्वीप मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील मतदारांचा टक्का ७० टक्क्यांच्या पुढे जावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांना मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन शेवटच्या दहा दिवसांमध्ये करण्यात आले आहे. धावपटू, महापालिका आणि प्रशासनाच्या नियोजनातून शुक्रवारी शहरात धावपटूंसाठी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. कोर्ट नाका परिसरात सकाळी सात वाजल्यापासून ही दौड आयोजित करण्यात आली होती. सकाळपासून मोठ्या उत्साहात प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, तसेच धावपटू मोठ्या उत्साहात उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, स्वीप उपक्रम नोडल अधिकारी रेवती गायकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार तसेच अन्य अधिकारी कर्मचारी व धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला सर्व सहभागी धावपटूंना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी शुभेच्छा देऊन मतदान जनजागृती करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी कार्यालय, जांभळीनाका, दगडीशाळा, गजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप, साईबाबा मंदिर, घंटाळी मंदिर, सत्यम कलेक्शन, राममारुती रोड, न्यू इंग्लिश स्कूल, पी. एन. गाडगीळ- गडकरी रंगायतनमार्गे परत दगडी शाळा, जांभळी नाका, भवानी चौक ते पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन या स्पर्धेचा समारोप झाला. धावून आलेल्या स्पर्धकांचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी पदक देऊन स्वागत केले.