म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल काही नवीन नाही. मात्र सध्या होत असलेल्या पक्षांतरामुळे अनेक मोठमोठ्या पक्षांना गळती लागल्याचेच चित्र आहे. नवी मुंबईतही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. सध्या राष्टवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला गळती लागल्याची स्थिती आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेऊन सत्ता गाजवणाऱ्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले आहे. त्यामुळे पूर्वीची राष्ट्रवादीमय असलेली नवी मुंबई आता भाजपमय झाली आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या नवी मुंबईत गणेश नाईकांसह त्यांचे ५५ नगरसेवक पक्षबदल करून भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे महापालिकेवर असणारी राष्ट्रवादीची सत्ता भाजपच्या हातात गेल्याचे चित्र आहे. राष्टवादीचे नेते जरी भाजपमध्ये गेले असले तरी राष्ट्रवादीला आणि शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आजही नवी मुंबईत आहे. नवी मुंबईत असणाऱ्या मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील व्यापारी, कामगार हा घटक तसेच पुणे, सातारा, सांगली या भागातील नागरिक पवारांना मानतात. त्यामुळे नेते राष्ट्रवादी सोडून गेले तरी या घटकांचा राष्ट्रवादीवर विश्वास असण्याची शक्यता आहे. २०१४च्या निवडणुकीत गणेश नाईक यांना मिळालेल्या मतांचा आकडा ५३ हजार होता. तर संदीप नाईक यांना ७२ हजार मते मिळाली होती. त्यामुळे नाईक यांच्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबईतील अस्तिस्त्व आता स्पष्ट होणार आहे. बेलापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक अशोक गावडे निवडणूक लढवत आहेत. तर ऐरोलीमधून गणेश शिंदे हे उमेदवार आहेत. गावडे ज्येष्ठ नेते असले तरी शिंदे हे फारसे परिचयाचे नाहीत. त्यामुळे आता राष्ट्रवादीची भिस्त अशोक गावडे यांच्यावर आहे. या दोन्ही उमेदवारांना मिळणारी मते किती आहेत यावरून राष्ट्रवादीला मानणारा वर्ग किती आहे, हे स्पष्ट होणार आहे.
नवी मुंबईत अस्तित्वाची लढाई
म टा वृत्तसेवा, नवी मुंबई निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल काही नवीन नाही...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Oct 2019, 4:00 am