म. टा. वृत्तसेवा, ठाणे
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पुकारलेल्या माल वाहतूकदारांच्या बेमुदत देशव्यापी संपाला ठाणे जिल्ह्यातील वाहतूकदारांनीही पाठिंबा दिला आहे. संपामुळे जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी बुकिंग घेणे बंद केले असून गाड्यांची वाहतूक मंदावली आहे. मात्र या संपामुळे दोन दिवसांत जिल्ह्यात सुमारे चार ते पाच कोटींचा फटका बसल्याची माहिती ठाणे जिल्हा ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक संघाचे सचिव भटेसिंग राजपूत यांनी 'मटा'ला दिली.
संपाला जिल्ह्यातील वाहतूकदारांच्या असलेल्या पाठिंब्याबाबत तसेच स्थानिक पातळीवरील वाहतूकदारांच्या मागण्यांचे निवेदनही शुक्रवारी ठाण्याचे जिल्हाधिकारी यांना दिले. या निवेदनाच्या माध्यमातून वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या समस्याही निदर्शनास आणून दिल्या आहेत. मुंब्रा-बायपासवरील कमकुवत झालेला पूल आणि रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी करताना माणकोली नाक्यापासून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांची बेकायदा अडवणूक करण्यात येत असल्याचे संघाचे म्हणणे आहे. तसेच, जिल्ह्यात वाहनतळ नाही. परिणामी, रस्त्यावरच गाड्या पार्क कराव्या लागत आहेत. वाहनतळ उभारण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत असल्याचेही संघाचे सचिव राजपूत यांचे म्हणणे आहे. शिवाय, गाड्या पासिंग करण्यासाठी 'ब्रेक टेस्ट ट्रॅक'ही उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे राजपूत यांनी सांगितले. वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी संघाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
या संघाशी जिल्ह्यातील २६ असोसिएशन संलग्न असून वाहतूकदारांच्या देशव्यापी संपात अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहतूकदार सहभागी झाल्याचा दावा संघाने केला आहे. जिल्ह्यात आरटीओकडे नोंदणी झालेल्या मालवाहतूकदार गाड्यांची संख्या १३ लाखांच्या आसपास आहे. संपाला पाठिंबा म्हणून मोठ्या प्रमाणावर गाड्या उभ्या आहेत. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनीही बुकिंग घेणे बंद केले आहे. मालाची वाहतूक करण्यासाठी फोन येत आहेत. मात्र संप असल्याने वाहतूक केली जात नाही. या संपामुळे ठाणे जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत चार ते पाच कोटींचा फटका बसल्याची शक्यता संघाचे सचिव राजपूत यांनी व्यक्त केली. संघाशी संलग्न असलेल्या असोसिएशन यांनाही संघातर्फे पत्र लिहून गाड्या बंद ठेवण्याविषयी सांगणार असल्याचेही राजपूत म्हणाले.
डिझेल दरवाढ वर्षातून दोनदाच करावी
डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींमध्ये दररोज दरवाढ होत असल्याने याचा नाहक भुर्दंड माल वाहतूकदारांना सहन करावा लागत आहे. अनेक वाहतूकदारांनी कंपनीशी मालाची ने-आण करण्याबाबत करार केलेले असतात. मात्र डिझेलचे दिवसाला भाव बदलत असतात. डिझेलचे भाव वाढले किंवा कमी झाले तरी कंपनीकडून वाहतूकदाराला कराराप्रमाणेच पैसे दिले जातात. त्यामुळे सहा महिन्यांतून एकदा आणि वर्षातून दोनदाच वाढ करावी, अशी मागणी असल्याचे राजपूत यांनी सांगितले.