- आघाडी न झाल्यास काँग्रेस सर्व मतदारसंघांत उमेदवार देणार
- शिवसेना झाली आक्रमक
म. टा. वृत्तसेवा, पालघर
पालघर विधानसभेसाठी जनता दल (से) पक्षाने आघाडीकडून जागा मिळावी म्हणून मागणी केली आहे. त्याचवेळी मनसेने पालघरसह डहाणू, विक्रमगड, बोईसर या चार विधानसभा मतदारसंघांत स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. आघाडीतर्फे काँग्रेसचा उमेदवार उभा करण्यात येणार आहे. त्यामुळे पालघर विधानसभेच्या निवडणुकीची रंगत आता वाढण्याचे चिन्ह दिसत आहेत,
जनता दल (से) ने मागच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे पालघर विधानसभा निवडणुकीत आघाडीतील सर्व पक्षांनी आता जनता दलाच्या उमेदवारास पाठिंबा द्यावा, असे आवाहन जनता दलातर्फे पालघर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष प्रकाश लवेकर यांनी केले आहे.
वाढती बेरोजगारी, जातीय वाद, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या व विकास याबाबतीत भाजपा-शिवसेना युतीचे हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या निवडणुकीत युतीचा पराभव करणे आवश्यक आहे, असे जनता दलाच्या जिल्हा नुकताच झालेल्या बैठकीत जिल्हा अध्यक्ष प्रकाश लवेकर यांनी संगितले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या अध्यक्षतेखाली चार विधानसभा मतदारसंघांत मनसेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालघरसह बोईसर, डहाणू, विक्रमगड या चार विधानसभा मतदारसंघांत मनसेचे उमेदवार उभे केले जातील, असे संखे म्हणाले.
बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट व जनता दल (से) यांची मागच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आघाडी झालेली आहे. त्यावेळी ठरल्यानुसार यापुढे सर्व निवडणुका आघाडीतर्फे लढवल्या जातील. त्याप्रमाणे पालघर विधानसभेची जागा काँग्रेसकडे आहे तर डहाणूची कम्युनिस्ट पक्षाकडे तर विक्रमगड राष्ट्रवादी काँग्रेसकडे व बोईसर, नालासोपारा, वसई या विधानसभा बहुजन विकास आघाडी लढवणार आहे, मात्र आघाडी झाली नाही, तर सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार उभे करेल, असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले.
आघाडीविषयी अनिश्चितता
यामुळे पालघर विधानसभा मतदारसंघात आघाडी युती व मनसे असे तिरंगी लढत होणार की आघाडी हे अद्याप स्पष्ट नाही. आघाडी किंवा युती झाली नाही तर मात्र पालघर विधानसभेचे चित्र बदलेल असे दिसून येत आहे. त्यातच युतीमध्ये पालघर विधानसभेसाठी शिवसेनेमध्ये उमेदवारांची गर्दी झाली आहे. मागील विधानसभा पोटनिवडणुकीनंतर शिवसेने डहाणू तालुक्यातील अमित घोडा यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे यावेळी पालघर तालुक्यातील उमेदवारासच तिकीट मिळाले पाहिजे, अशी भूमिका तालुक्यातील शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यामुळे डहाणू तालुक्यातील श्रीनिवास वनगा यांना पालघर तालुक्यातील मतदार स्वीकारतील की नाही, याबाबत शिवसैनिकांमध्ये मतांतरे दिसत आहेत.