म. टा. वृत्तसेवा, कल्याण
आंबिवली स्थानकानजीक असणाऱ्या बाळकृष्ण पेपर मिलमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आंबिवलीत सम्राट अशोक नगर परिसरात राहत असणारे अशोक आरेनकर (५२) यांना कंपनीत काम करीत असताना बुधवारी मध्यरात्रीनंतर अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने व्यवस्थापनाने त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर, गुरुवारी दुपारच्या सुमारास मशीनवर काम करणाऱ्या उमेश काळुराम जाधव (४२) हा कामगार मशीनमध्ये पेपर टाकत असताना त्याचा हात मशीनमध्ये गेला. या झटापटीत तो जमिनीवर जोराने आदळल्याने त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या घटना या कारखान्यात घडल्याने कामगारवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कंपनी प्रशासनाकडून कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. बाळकृष्ण पेपर मिलचे मॅनेजर अतुल भारती यांच्याशी संपर्क साधला असता, दोन्ही कामगारांच्या कुटुंबीयांना कंपनीच्या सर्व सुविधा दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.