पाच वर्षात यंदा फुटला नारळ; अनेकांना माहितीच नाही
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
एखाद्या गुन्ह्यात शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला समाजात नव्याने आयुष्याची सुरुवात करता यावी, यासाठी राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी मुक्तबंदी योजना आणली. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतल्यास प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षी या योजनेला सुरुवात झाल्याचे दिसून आले. लाभार्थीच नसल्यामुळे मुक्तबंदी योजना गेली चार वर्षे केवळ कागदावर होती. यावर्षी एका लाभार्थीला लाभ देण्यात आला असून अद्याप योजना अनेकांपर्यंत पोहोचलीच नसल्याचे अधोरेखित होत आहे.
शिक्षा भोगल्यानंतर समाजात कैदी अथवा बंदी ही ओळख पुसण्यासाठी आणि कुटुंबीयांबरोबर नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी त्याला नवा रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. कैदी ही ओळख पाठीशी असल्यास त्याला बँक अथवा समाजातील कोणतीच व्यक्ती मदतीसाठी पुढे येत नाही. त्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहासाठी सरकारने १६ मे १९५८मध्ये मुक्तबंदी योजना आणली. महिला व बाल विकास योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजनेत गेल्या ६१ वर्षांत फार कोणते बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ही योजना लोकांपर्यंत पोहोचली नाही. ठाण्यात २०१५पासून या योजनेतील लाभार्थी पाहिल्यास २०१९मध्ये केवळ एका लाभार्थीने याचा लाभ घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. कारागृहात शिक्षा भोगत असताना घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणली असली तरी ती लाभार्थींअभावी कागदावरच आहे.
…………………पाच हजारांवरून २५ हजार
या योजनेच्या माध्यमातून मुक्तबंदीला नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्वी पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य केले जात होते, मात्र गेल्या दोन वर्षांपासून या रकमेमध्ये वाढ करत ती २५ हजारांपर्यंत करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येते. यावर्षी फक्त एका लाभार्थीला या योजनेतून लाभ देण्यात आला आहे.