म. टा. वृत्तसेवा,वसई
देशभर लॉक डाऊनची स्थिती असताना अनेकजण याचा संधीचा फायदा घेताना दिसत आहेत. कुणी साठेबाजी करत आहेत, तर कुणी अधिक किमतीने मालाची विक्री करत आहेत. मात्र, वसईतील गुप्ता कुटुंब याला अपवाद म्हणावे लागेल. वसईच्या कामण परिसरातील हरिश्चंद्र गुप्ता आपल्या दुकानामधून लोकांसाठी मोफत धान्यपुरवठा करत आहेत. सध्या महामार्गावर गावाच्या दिशेने पायी चालत जाणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. अशा वाटसरूंना या दुकानाचा मोठा आधार मिळत आहे.
करोनाच्या जागतिक संकटाने संपूर्ण देश स्तब्ध झाला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई येथे १९५६साली हरिश्चंद्र गुप्ता यांचे कुटुंब उत्तरप्रदेशातून आले होते. सन १९७४ साली कोल्ही चिचोंटी येथे त्यांनी छोट्याशा झोपडीत किराणा मालाचे दुकान सुरू केले. आजूबाजूला कुणीही नव्हते. काही आदिवासी कुटुंबे होती. तीही पाड्यात विखुरलेली. कालांतराने महामार्ग झाला. हा मार्ग मुंबई ते गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार असा दिल्लीला जोडतो. कधीही न थांबणारा हा महामार्ग आता मात्र रिकामा आहे.
उपासमारीमुळे बहुतेक लोक पायी चालत जात असताना या गुप्ता कुटुंबाला दिसत आहेत. गरीब आणि कष्टकरी हातावर कमावणाऱ्या लोकांसमोर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, हीच महाराष्ट्राने केलेल्या उपकारांची फेड करण्याची संधी आहे, असे समजून गुप्ता कुटुंब हे दुकानवर येणाऱ्या वाटसरू तसेच गरीब गरजूंना विनामूल्य धान्यवाटप करत आहे. त्यांना पाण्याची बाटली, खाद्य देवून गरज पडल्यास निवाराही देत आहेत. धान्यवाटप करण्यासाठी त्यांनी आणखी धान्यसाठा मागवला आहे.
त्यांना पाच मुले असून तीही आई वडिलांना या कामी मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. गुप्ता कुटुंबाच्या रूपाने संकटसमयी खरा माणूसकीचा झरा दिसून येत असल्याची भावना वसई परिसरात व्यक्त होत आहे.