केंद्रातीलच दोन तरुणींचे कृत्य
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
रायते येथील दिशा नशामुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या ३४ वर्षीय किशोरी सावंत या तरुणीची हत्या याच केंद्रात उपचार घेत असलेल्या ईशा पांडे आणि विशाखा पोटावे यांनी केल्याचे उघड झाले आहे. या तरुणींन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. नशामुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर कुटुंबियांकडून या तरुणींना परत नेले जात नसल्यामुळेच या केंद्रात हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तरी आपल्याला कुटुंबीय परत नेतील, या अपेक्षेने आपण हत्या केल्याचा जबाब त्यांनी नोंदवला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले.
रायते येथील नशामुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या किशोरी सावंत या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी दाखल केले असता उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाल्याची तक्रार दिशा नशामुक्ती केंद्र संचालकाकडून टिटवाळा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र तिच्या मृत्यूनंतर या केंद्रात तिचे सामान घेण्यासाठी गेलेली किशोरीची बहीण दीपश्री हिला किशोरीची तिच्याबरोबर वावरणाऱ्या दोन सहकाऱ्यांनी हत्या केल्याची माहिती मिळाल्याने तिने याप्रकरणी ईशा आणि विशाखा या दोन तरुणींविरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी टिटवाळा पोलिसांनी या दोघींना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी किशोरीच्या हत्येची कबुली दिली. आपल्याला कुटुंबियांनी परत न्यावे, यासाठी हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले.
नशामुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर कुटुंबीय आपल्याला परत केव्हा नेणार, याची या रुग्णांना प्रतीक्षा असते, मात्र घरी नेले नाही, तर त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. त्यातच या नशामुक्ती केंद्रात दाखल होणाऱ्या रुग्णांवर त्यांची नशा सोडविण्यासाठी अघोरी उपचार केले जात असून त्यांना प्रचंड मारहाण केली जात असल्याचा आरोप या नशामुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. यामुळे या नशामुक्ती केंद्रातील रुग्णांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.