म. टा. वृत्तसेवा, कल्याण
शिक्षणासह प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत असल्यामुळे आगरी-कोळी बांधवांनी आपल्या विचारांची श्रीमंती वाढविण्याची गरज आहे. आपल्या समाजात एखाद्याची उन्नती होत असेल, तर त्याचे पाय खेचण्याचे प्रकार सर्रास घडतात. ही वृत्ती सोडून संघटित व्हा. समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होत असून या अन्यायाविरोधात लढण्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे. म्हणूनच आपापसात लढण्यापेक्षा आगरी-कोळी समाजातील तरुणांनी विचाराने समृद्ध आणि श्रीमंत होणे गरजेचे आहे, असे मत खासदार कपिल पाटील यांनी मांडले.
कल्याण शहरातील आगरी-कोळी बांधवाना एकत्रित आणण्यासाठी यंदापासून सुरू करण्यात आलेल्या आगरी-कोळी महोत्सवाचे उद्घाटन खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कोळी समाजाचे नेते अनंत तरे, राजाराम साळवी, शिवसेना उपनेते आदेश बांदेकर, महापौर विनीता राणे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ३० नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा महोत्सव २ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा समारोप केला जाणार आहे.
कपिल पाटील यांनी, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आगरी-कोळी बांधव राहत असून त्यांच्या जमिनीवर अनेक प्रकारची आरक्षणे टाकली जात आहेत. मात्र या पालिका क्षेत्रात समाज बांधवांसाठी भवन नसल्याचे सांगत त्यांनी महापौर विनीता राणे यांना आगरी कोळी भवनासाठी आरक्षित भूखंडातून भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी केली. समाजाच्या नगरसेवकांना येत्या महासभेत भवनासाठी जागा मंजूर करून घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली. सरकारने अनेक कायद्याचा आधार घेत आगरी-कोळी बांधवांचे अधिकार हिरावले असून याविरोधात लढा देण्यासाठी दोन्ही समाजांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत राजाराम साळवी यांनी मांडले. तर अनंत तरे यांनी खासदार पाटील यांच्याकडे आपल्या समाजाच्या व्यक्तीला मंत्रीपद मिळावे, यसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. महापौर राणे यांनी आगरी कोळी भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देताच उपस्थितांमधून टाळ्यांचा गजर झाला. यानंतर रंगलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आगरी-कोळी समाजाच्या परंपरेची दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.