म. टा. वृत्तसेवा, उरण
गेल्या आठवडाभरापूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकणची दाणादाण उडवून टाकली असून, कोकणी माणसाच्या डोक्यावरचे छप्पर तर हिरावून घेतलेच, पण उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या बागादेखील उद्ध्वस्त केल्या आहेत. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावरील कोकणचे प्रवेशद्वार असलेला रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुके या वादळात उद्ध्वस्त झाले आहेत.
यात सर्वाधिक फटका श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, अलिबाग, मुरुड, पेण या तालुक्यांना बसला आहे. येथील कौलारू घरांचे मोठे नुकसान झाले आहे, तर नारळी-फोफळी आणि आंब्याच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. तसेच पर्यटनाच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या येथील ग्रामस्थांचे उत्पन्नाचे साधनही नष्ट झाले आहे. इथल्या उद्ध्वस्त बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी किमान दहा ते बारा वर्षे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुपारी, आंबा, नारळाच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले असून, आता जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
८४९ शाळांचे नुकसान
जूनच्या सुरुवातीला सुरू होणाऱ्या शाळा यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातच, लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात शाळा सुरू करण्याचे विचाराधीन असतानाच, रायगड जिल्ह्यात धडकलेल्या निसर्ग वादळाने शाळांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शाळांच्या भिंती कोसळणे, छताचे पत्रे-कौले उडून जाणे अशाप्रकारे सुमारे ८४९ शाळांचे नुकसान झाले आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी सुमारे १५ कोटींपेक्षा अधिक रकमेची आवश्यक भासणार आहे. त्यातच वादळामुळे कोलमडलेल्या विजेमुळे ऑनलाइन शिक्षणही थांबले आहे.