निर्धारित मुदत गाठताना दमछाक
एप्रिल २०२१पर्यंत खुला करण्याचा प्रयत्न
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
कोपरी रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू होऊन १४ महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असून पुढील २२ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम कंपनीवर आहे. परंतु कोपरी पुलाच्या बांधणीत अडथळ्यांची शर्यत सुरू झाल्यामुळे या कामाची डेडलाइन पाळताना मोठी दमछाक सुरू झाली आहे. पुलाचे काम सुरू असलेल्या भागातील महाराष्ट्र वीज महामंडळाच्या विद्युतवाहिन्यांचे स्थलांतर रखडले आहे. तर पुलास अडथळा ठरणाऱ्या वृक्षांचे स्थलांतरही झाले नसल्यामुळे हे काम अधिक रखडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
कोपरी पुलाच्या दोन्ही बाजूस दोन नव्या मार्गिका बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई व ठाण्याच्या दिशेस असणाऱ्या मार्गिकेचे काम एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. तर रेल्वे पुलावरील काम रेल्वेमार्फत सुरू आहे. ज्ञानसाधना कॉलेजच्या बाजूस असणाऱ्या चार खांबाचे काम रेल्वेमार्फत सुरू झालेले आहे. तर पूर्वेकडील भागात महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थलांतर न केल्यामुळे विलंब लागल्याचे समोर आले आहे. खासदार राजन विचारे यांनी याविषयी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी भूमिगत फिडर आणि वाहिन्यांचे नियोजन असल्यामुळे हा वेळ लागत असल्याचा खुलासा केला. काम न थांबवता ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना विचारे यांनी यावेळी दिल्या. या पुलाच्या रुंदीकरणाच्या कामात बाधित ७ वृक्षांचे स्थलांतरण कधी होणार, याची विचारणा केली असता ही सात झाडे स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. बांधकाम ठेकेदार आणि रेल्वे प्रशासनाकडून हे अडथळे दूर करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न असून त्यानंतर ही कामे पूर्णत्वास जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
संरक्षण भिंतीची कामेही सुरू…
ज्ञानसाधना कॉलेजच्या दिशेला असणाऱ्या ४०० मीटर लांबीच्या रुंदीकरणासाठी संरक्षण भिंतीचे काम ५० मीटरपर्यंत करण्यात आले आहे. तसेच बारा बंगला पूर्वेकडील ३५० मीटर लांबीच्या रुंदीकरणासाठी संरक्षण भिंतीचे काम १६० मीटर करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आनंदनगर येथे सुद्धा ३५० मीटर लांबीच्या रुंदीकरणासाठी संरक्षण भिंतीचे काम १३० मीटर पूर्ण करण्यात आल्याची पाहणी खासदार विचारे यांनी केली.