वृत्तसंस्था, नवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने बोनकोडे खैरणेमध्ये शाळेसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीचे लोखंडी प्रवेशद्वार अंगावर पडून पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला असून त्याच्या पायाचे हाड मोडले आहे. या घटनेने बोनकोडे गावातील शिवाजीनगर परिसरात शोककळा पसरली आहे. सौरभ चौधरी असे या जीव गमावलेल्या मुलाचे नाव आहे. कोपरखैरणे परिसरातील रा. फ. नाईक शाळेमध्ये तो पाचवी इयत्तेत शिकत होता.
बोनकोडे खैरणे परिसरात बालाजी कॉम्प्लेक्सच्या बाजूला पालिकेच्यावतीने ४० कोटी रु. खर्च करून शाळेसाठी इमारत बांधली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून ही इमारत न वापरता पडून आहे. येत्या जूनमध्ये या इमारतीत शाळा सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे. मात्र, या दुर्घटनेमुळे इमारतीच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सौरभचे वडील संजय चौधरी हे शिलाईकाम करतात तर आई गृहिणी आहे. तर त्याचा मोठा भाऊ त्याच्या बरोबर रा. फ. नाईक शाळेत शिकत आहे. या परिसरातील पाच-सहा मुले शाळेच्या आवारात खेळायला गेली होती. गेट बंद करताना त्यावेळी गेटच्या पिलरमधून निखळून, स्लायडिंगवरून घसरून हे लोखंडी जड गेट मुलांच्या अंगावर पडले.
दरम्यान, महानगर पालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप सौरभच्या नातेवाईकांनी केला आहे. तर या प्रकारची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली आहे.