म. टा. वृत्तसेवा, पालघर
वाडा व विक्रमगड तालुक्यात पंचायत समितीमार्फत घेण्यात येणारी मात्र गेली चार वर्षे रखडलेली आमसभा आमदार शांताराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली १९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.
वाडा व विक्रमगड हे तालुके ग्रामीण व आदिवासी दुर्गम भाग म्हणून संबोधले जातात. या तालुक्यांच्या क्षेत्रात अनेक गावे जोडली आहेत. या तालुक्यांत एक आमदार व कॅबिनेट मंत्री व दोन खासदार असूनही चार वर्षांत एकही आमसभा झाली नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले होते. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. आता ही सभा १८ ऑगस्टला आमदार शांताराम याच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सरकारच्या परिपत्रकानुसार वर्षाला किमान एकदा आमसभा बोलावणे गरजेचे असते. त्यामुळे चार वर्षांपासून तालुक्यातील नागरिकांचे विविध प्रश्न, समस्या आमसभेत चर्चेत घेऊन ते सोडवण्याबाबत आमसभेत निर्णय घेतला जाईल, असे पंचायत समिती सदस्य अरुण अधिकारी यांनी सांगितले. या दोन्ही तालुक्यांत भाजप व शिवसेनेचे आमदार असून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने राजकारण होत राहिल्यामुळे या समस्या अधिक जटील होत गेल्या आहेत.