अ‍ॅपशहर

‘गार्डन सिटी’चे कल्याणला वेध

तुटकी खेळणी, खुरटलेली झाडे आणि बंद पडलेली कारंजी... या सगळ्यामुळे अगदी पावसाळ्यातही भकास भासणाऱ्या कल्याण पश्चिमेकडे तीन नवी उद्याने होणार असून गौरीपाडा तलावाचे सुशोभिकरणदेखील केले जाणार आहे.

Maharashtra Times 19 Apr 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three garden in kalyan
‘गार्डन सिटी’चे कल्याणला वेध


तुटकी खेळणी, खुरटलेली झाडे आणि बंद पडलेली कारंजी... या सगळ्यामुळे अगदी पावसाळ्यातही भकास भासणाऱ्या कल्याण पश्चिमेकडे तीन नवी उद्याने होणार असून गौरीपाडा तलावाचे सुशोभिकरणदेखील केले जाणार आहे. यापैकी तीनही उद्यानांची कामे येत्या महिनाभराच्या आत सुरू होतील. विशेष म्हणजे, जुन्या उद्यानांचे नूतनीकरण करून त्यांच्यातही चैतन्य आणले जाणार आहे.

नवी मुंबईला उद्यानांचे शहर म्हटले जाते. ठाण्यातही गेल्या वर्षभरात काही नवी उद्याने साकारण्यात आली. परंतु कल्याणात मात्र टवटवीत उद्यानांची कायम वानवा होती. सिंडिकेट परिसरातील राणी लक्ष्मीबाई उद्यान आणि पालिकेच्या मुख्यालयासमोरील शंकरराव झुंजारराव उद्यान हेच काय त्या लहानग्यांनी बागडण्याची जागा. त्यानंतरच्या काळात ओक बाग व माता रमाबाई आंबेडकर उद्यान झाले, पण त्यांची केव्हाच दुरवस्था झाली आहे. काळा तलाव परिसरातील खेळणीही तुटल्याने तिथे खेळायला येणाऱ्या लहान मुलांचा हिरेमोडच होतो.

मात्र येत्या काळात ही परिस्थिती पालटणार आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या ११ कोटी रुपयांच्या विशेष निधीतून स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांनी तीन नवी उद्याने आणि गौरीपाडा तलावाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आधारवाडी येथील महापौर बंगला परिसरात नेचर पार्क, गोदरेज हिल येथील रोझाली कॉम्प्लेक्सनजीक व गांधारे येथील लोढा कॉम्प्लेक्स या भागांमध्ये ही उद्याने पुढील ६ ते ८ महिन्यांच्या कालावधीत साकारली जातील, अशी माहिती आमदार पवार यांनी दिली. रोझाली व नेचरपार्क या दोन्ही उद्यानांच्या जागेला संरक्षक भिंत उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. गौरीपाडा तलावातील गाळ याआधीच काढण्यात आला असून सुशोभीकरणाच्या कामाची निविदा अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे. तलाव सुशोभिकरणासाठी सुमारे दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या तीनही कामांवर प्रत्येकी तीन कोटी रुपये खर्च होतील.

गांधारे येथील उद्यानासाठी २ कोटी रुपयांचा निधी नुकताच केडीएमसीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या उद्यानाचे काम पुढील २ ते ३ महिन्यांत सुरू होईल. दरम्यान, नव्या उद्यानांची कामे हाती घेताना सर्व जुन्या उद्यानांचादेखील कायापालट केला जाणार आहे. ही कामे खासगीकरणातूनच होतील. त्यासाठीचे टेण्डर लवकरच काढले जाईल, अशी माहिती मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. पालिका क्षेत्रातील हरीत क्षेत्र वाढण्यासाठी यापुढील काळात वड, पिंपळ व कडुलिंब यांसारख्या भारतीय व डेरेदार वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज