अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सतर्कता
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
अयोध्येतील निकालानंतर शहरामध्ये शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून सतर्कतेची पावले उचलण्यात आली होती. शहरामध्ये जमावबंदी असल्याने जाहीर महाआरती आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानग्या देण्यास नकार देण्यात आल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम पोलिसांनी रद्द करत कायदा सुव्यवस्था अबाधित राखली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कोणत्याही प्रकारचा सामाजिक तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त करण्यात आला होता. सोशल मीडियावरील कोणत्याही प्रकारच्या धार्मिक आणि गोंधळ निर्माण करणारे संदेश पाठवू नयेत यासाठी आवाहन करण्यात आले होते. नौपाडा परिसरातील घंटाळी मंदिराजवळील एका पक्षाकडून जाहीर महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु जमावबंदी असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्याचे पोलिसांकडून कळवण्यात आले. त्यामुळे आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द केल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. शहरातील धार्मिक स्थळांच्या परिसरातही चोख बंदोबस्त करण्यात आला होता.