अ‍ॅपशहर

कल्याण प्रवेशद्वारावरच रखडपट्टी

कल्याण शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या दुर्गाडी चौकात कल्याणकडून भिवंडीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची होणारी गर्दी, दुपदरी पुलावर पडलेले खड्डे, यामुळे कायमच मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.

Maharashtra Times 17 Aug 2017, 3:00 am
चौपदरी पूल रखडण्याची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic jam at durgadi chauk
कल्याण प्रवेशद्वारावरच रखडपट्टी


म. टा. वृत्तसेवा, कल्याण

कल्याण शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या दुर्गाडी चौकात कल्याणकडून भिवंडीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची होणारी गर्दी, दुपदरी पुलावर पडलेले खड्डे, यामुळे कायमच मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. दिवसभरातील कोणत्याही वेळी या चौकात होणारी कोंडी फोडण्यासाठी आता एमएमआरडीएच्या माध्यमातून चौपदरी पुलाचे काम सुरू करण्यात आले असले, तरी कोण गावाच्या दिशेकडील भूसंपादनाच्या वादात हा पूल रखडण्याची भीती व्यक्त होत आहे.

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याजवळील कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दुर्गाडी पुलाचा वापर पर्यायी रस्ता नसल्यामुळे कल्याण-डोंबिवलीबरोबरच उल्हासनगर, बदलापूरकडून ठाणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांकडून केला जात आहे. जड वाहनांची वाहतूकदेखील या पुलावरून मोठ्या प्रमाणात होते. दुपदरी असलेल्या या पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे वाहनांचा वेग कमालीचा मंदावतो. पत्रीपुलाकडून दुर्गाडी चौकाकडे जाणारी वाहने, आधारवाडीकडून येणारी वाहने, यामुळे नेहमीच या रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. परिणामी वाहनचालकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने एमएमआरडीएच्या निधीतून गोविंदवाडी बायपास उभारला. यामुळे शहरातील वाहतूक परस्पर गोविंदवाडीमार्गे दुर्गाडी पुलावर वळवण्यात आली असली, तरी दुर्गाडीकडून दुर्गामाता चौकात वळणाऱ्या रस्त्यावर तयार झालेला ‘बॉटल नेक’ वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे.

मोठ्या वाहनांना या ठिकाणी मोठा वळसा घ्यावा लागत आहे. दुर्गाडीकडून येणाऱ्या वाहनांसाठी कल्याणकडून येणारी वाहने रोखली जात असल्यामुळे वाहतूककोंडी फोडण्यासाठी केलेले प्रयत्न फारसे यशस्वी झालेले नाहीत. यामुळेच आता नेहमी या चौकात होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी आणि वाहनचालकांची वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून या पुलाला जोडूनच चौपदरी नव्या पुलाची उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. हा पूल पूर्ण झाल्यास दुर्गाडी चौकात होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची कायमची सुटका होणार आहे. मात्र यासाठी वाहनचालकांना आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार, हे नक्की.

(क्रमश:)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज