कर्जत-नेरळदरम्यानच्या महिलांनी व्यक्त केल्या भावना
एमआरव्हीसीच्या सर्वेक्षणातून वास्तव समोर
एमयुटीपी प्रकल्पाच्या आर्थिक मदतीसाठी अभ्यास
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
कर्जत, नेरळ आणि भिवपुरी रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या महिलांपैकी ४३ टक्के महिलांना रेल्वे परिसर असुरक्षित वाटतो. येथील १० महिला प्रवाशांपैकी ४ महिलांना धोका जाणवतो. सर्वाधिक छळ लोकलमधून प्रवास करताना होत असून महिला डब्यामधून प्रवास करणाऱ्या पुरुषांमुळेही कुचंबणा होते. रेल्वे स्थानकाबाहेर, पादचारी पुलांचे जिने, प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलांवरही असाच अनुभव असल्याच्या भावना महिला प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. एमआरव्हीसीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ही बाब उघड झाली आहे.
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्यावतीने कर्जत-पनवेल मार्गावर रेल्वे रुळांच्या दुहेरीकरणाचा प्रकल्प असून त्यासाठीच्या कामांना सुरुवात झाली आहे. परंतु या प्रकल्पासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडे आर्थिक मदतीची याचना करण्यात आली आहे. या भागातील वास्तव दाखवणारे सर्वेक्षण करून जून २०१४ रोजी एक अहवाल तयार करण्यात आला आहे. कर्जत, भिवपुरी आणि नेरळ स्थानकातील महिला प्रवाशांशी संवाद साधत मार्केट सर्च इंडिया या संस्थेने हा अहवाल तयार केला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक दावे या निमित्ताने पुढे आले आहेत. या स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या ७२ टक्के महिलांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने उभे राहून प्रवास करावे लागते. ४० वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या महिलांना त्याचा फटका बसतो. तर त्यामुळे गर्दीच्या काळात प्रवास करण्यास ६१ टक्के महिला नकार देतात. यामध्ये पहिल्या दर्जाच्या महिलांची संख्या सर्वाधिक आहे. गर्दी, त्रासदायक टोळकी, दोन स्थानकांमध्ये थांबणाऱ्या गाड्या, चोरीच्या घटना आणि पोलिसांची कमी संख्या यामुळे प्रवास टाळण्याचा प्रयत्न या महिला करतात, असे आढळून आले आहे.
पुरुषांकडून होणारा त्रास अधिक…
पुरुषांकडून होणारी कुचंबणा महिलांसाठी मोठी डोकेदुखी असून लोकलच्या गर्दीचा फायदा घेत त्रास देणारी मंडळी रेल्वे गाड्यांमध्ये अधिक असल्याचा अनुभव महिलांनी व्यक्त केला आहे. ४३ टक्के महिलांना रेल्वे प्रवास असुरक्षित वाटतो. तर ५७ टक्के महिला फारसा त्रास नसल्याचे सांगतात. १० पैकी ४ महिलांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली असून ४० वर्षांखालील महिलांनी याविषयी अधिक चिंता व्यक्त केली आहे. कर्जतहून प्रवास करणाऱ्या महिलांना अशा छळाला सर्वाधिक बळी पडावे लागत असल्याचेही या सर्वेक्षणाचे म्हणणे आहे. ६१ टक्के महिला या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकार घेतात. त्यात १८ ते २५ वयोगटातील महिलांची संख्या अधिक आहे. यामध्ये पहिल्या श्रेणीच्या डब्यातील महिलांची संख्या ८३ टक्के आहे.
महिला अनभिज्ञ
४९ टक्के म्हणजे अर्ध्या महिलांना रेल्वे हेल्पलाइनविषयी माहिती नसल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. हेल्पलाइनबद्दल १८ ते २५ वर्षांच्या महिलांना अधिक माहिती असली तरी इतर महिलांची संख्या कमी आहे. तर ८२ टक्के महिलांना यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नसल्याचे समोर आले आहे.
अपुऱ्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह…
एमआरव्हीसीसारख्या संस्थेने केवळ कर्जत, नेरळ आणि भिवपुरी या तीन स्थानकांचे केलेले सर्वेक्षण अत्यंत अपुरे आणि कमी नमुन्यांच्या आधारे केल्याचे वास्तव समोर आले आहे. हजारो महिला प्रवासी प्रवास करत असताना अवघ्या १४२ महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळे यावर महिला संघटनांनी प्रश्नचिन्ह व्यक्त केले असून हे प्रमाण त्यापेक्षाही जास्त असू शकते, असा दावा करण्यात आला आहे. तर महत्त्वाची गर्दीची स्थानके आणि मध्यवर्ती रेल्वे स्थानकातील महिला प्रवाशांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही यानिमित्ताने होत आहे.