वृक्ष प्राधिकरणावरील सदस्यांची निवड असो, किंवा बांधकाम व्यावसायिकांना झाडे तोडण्यासाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्या असोत, ठाणे महापालिकेचा वृक्ष विभाग कायम वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. तीन वर्षांत पाच लाख झाडांची लागवड या विभागामार्फत झाली असेल तर तो आजवरचा विक्रमच म्हणावा लागेल. फुटकळ कामांच्या प्रसिद्धीसाठी आटापिटा करणाऱ्या पालिकेने एवढ्या मोठ्या कामाचे श्रेय कसे घेतले नाही, हा कुतूहलाचा मुद्दा आहे. मात्र, जर अशा पद्धतीने वृक्ष लागवड झाली असेल तर त्याची माहिती पारदर्शी पद्धतीने जाहीर करण्याचे धाडस या विभागाने दाखवायला हवे. तसेच, वृक्ष लागवडीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असताना लागवड झालेल्या वृक्षांची देखभाल आणि निगा राखली जाते का, याबाबतची माहितीसुद्धा पुढे यायला हवी. तसेच, अनेक ठिकाणी कत्तल केलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण केले जात असल्याचे पालिकेतर्फे सांगितले जाते. त्या पुनर्रोपणातून ९० टक्के झाडे जगतात, असे दावेही केले जातात. त्या पद्धतीने किती आणि कुठली झाडे जगली, याची माहितीसुद्धा समोर यायला हवी. पर्यावरण संवर्धनसाठी पालिका एवढी सजग असेल तर त्यांचे नक्कीच कौतुक करायला हवे. मात्र, केवळ खर्चाचे आकडे वाढविण्यासाठी कागदोपत्री झाडांची संख्या वाढविली जात असेल तर त्याची चौकशीसुद्धा व्हायला हवी.
पारदर्शकतेने माहिती जाहीर व्हावी
वृक्ष प्राधिकरणावरील सदस्यांची निवड असो, किंवा बांधकाम व्यावसायिकांना झाडे तोडण्यासाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्या असोत, ठाणे महापालिकेचा वृक्ष विभाग ...
Maharashtra Times 24 Aug 2018, 4:00 am