(फोटो आहेत)
म. टा. वृत्तसेवा, वसई
वसई-विरार महापालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून पुन्हा एकदा कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागील महिन्यात केलेल्या संपानंतर दिलेली आश्वासने कंत्राटदाराने पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वसई-विरारमधील परिवहन सेवा बंद पडली आहे.
पगार वाढ, वेळेवर पगार न होणे, भविष्य निर्वाह निधी, महागाई भत्ता अशा विविध मागण्यांसाठी वसई-विरार महापालिका परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी जानेवारीत मकरसंक्रांतीच्या दिवशी काम बंद आंदोलन पुकारले होते. यात ७००हून अधिक कंडक्टर आणि चालक सहभागी होते. यामुळे वसई-विरारमधील सर्वच मार्गावरील परिवहन सेवा ठप्प झाली होती. पूर्वसूचना न देता पुकारलेल्या या संपामुळे सर्वच नागरिकांचे खूप हाल झाले होते. अनेकांचा रोजगारही यामुळे बुडाल्याची घटना घडली आहे. मात्र, हा संप चार दिवसानंतर परिवहन कंत्राटदाराने दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला होता. यावेळी महापालिकेने मध्यस्थी करत कंत्राटदार आणि कर्मचारी यांच्यात चर्चा करून यावर तोडगा काढला होता. १० तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचा एकरकमी पगार, थकीत असलेला भविष्य निर्वाह निधी, महागाई भत्ता या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन लिखित स्वरूपात कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही याची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप परिवहन कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच १० तारखेनंतरही फेब्रुवारीत पगार न झाल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी ११ तारखेपासून पुन्हा बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यासाठी वसई-विरार महापालिकेच्या विरारच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे कोणतीही पूर्वसूचना न देता पूर्ण शहरातील १६० बसेस या बंद असल्याने सर्वसामान्य बस प्रवाशांचे मात्र हाल झाले. मागच्या दोन महिन्यांत हे दुसरे आंदोलन आहे. कर्मचारी वारंवार पगारासाठी आंदोलन करीत असतानासुद्धा कंत्राटदार पगार वेळेवर देत नसल्याने आज सर्व परिवहन कर्माच्याऱ्यांनी महापालिकेच्या विरार येथील मुख्य कार्यालायासमोरच ठिय्या दिला आहे. पगार मिळणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्राही या कर्मचारी यांनी घेतला आहे.
परिवहन सेवेचे पुन्हा नुकसान
जानेवारीत केलेल्या चार दिवसीय संपामुळे शहरातील परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर धावली नाही. चार दिवसात नागरिकांच्या गैरसोयीबरोबरच पालिकेच्या परिवहनचे तब्बल ४० लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली होती. पालिकेच्या वसई-विरार शहरातील विविध मार्गांवर दररोज १४० बसेसद्वारे सेवा दिली जाते. यातून दिवसाकाठी साधारणपणे १० लाख रुपये इतके उत्पन्न परिवहनला मिळते. परंतु, चार दिवस या बसेस रस्त्यावरच धावू न दिल्याने जवळपास ४० लाखांचे नुकसान झाले होते. मात्र, आता पुन्हा हा बेमुदत संप पुकारल्याने पुन्हा एकदा परिवहनला नुकसान सोसावे लागणार आहे.
कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर झाला पाहिजे, हे आमचेही मत आहे. मात्र पूर्व कल्पना न देता पुकारलेल्या या काम बंद आंदोलनामुळे वसई-विरारमधील जनतेला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच यामुळे अनेक चाकरमान्यांचा रोजगारही बुडाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये.
- प्रीतेश पाटील, परिवहन सभापती, वसई-विरार महापालिका
आम्ही कर्मचाऱ्यांकडे दोन दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र त्यांनी ती दिली नाही आणि काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे. कर्मचाऱ्यांशी बोलणे सुरू असून, यावर तोडगा लवकरच तोडगा काढण्यात येईल.
- तुकाराम शिवभक्त, आगार व्यवस्थापक, परिवहन सेवा