म. टा. प्रतिनिधी, ठाणे
भिवंडीतील शांतीनगर येथील पिरानी पाडा येथील सहा वर्षांपूर्वी बांधलेली चार मजली 'मनोहरा' ही अनधिकृत इमारत शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या इमारतीचा मालक मुन्वर अली अहमद हुसेन अन्सारी (३९) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
मुन्वर अली अहमद हुसेन अन्सारी याच्या मालकीच्या जमिनीवर सहा वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. अनधिकृतपणे आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्यातून उभारण्यात आलेली ही इमारत अवघ्या सहा वर्षांमध्ये धोकादायक झाली. त्यामुळे इमारतीमधील २२ कुटुंबांना भिवंडी अग्निशमन दलाने सुरक्षित स्थळी हलवले होते. परंतु काही रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून सामान काढण्यासाठी शुक्रवारी रात्री इमारतीमध्ये प्रवेश केला. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळली. या दुर्घटनेत सिराज अहमद अन्वर अन्सारी (२६) आणि मोहम्मद आकिब मोहम्मद हबीब शेख (२७) यांचा मृत्यू झाला. तर, अब्दुल अजीज सय्यद (६५), जावेद कलिमुद्दीन शेख (३६), निजाम मोहम्मद अली सिद्दिकी (४५), सुफीयान अब्दुल हसन अन्सारी (२३) तसेच भिवंडी अग्निशमन दलाचे उप स्थानक अधिकारी नरेंद्र बवाणे (३५) आणि जवान देवीदास वाघ (३४) हे सहा जण जखमी झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच ठाणे टीडीआरएफ, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.