म. टा. वृत्तसेवा, पालघर
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते कटरादरम्यान धावणाऱ्या स्वराज एक्स्प्रेस व म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या व महत्त्वाच्या दोन गाड्यांना पालघर स्थानकात थांबा देण्यात आला असून शुक्रवारी या गाडीचे स्वागत पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. प्रवाशांना शुभेच्छा दिल्या.
बंगळुरू, चेन्नई आदी भागांतील अनेक नागरिक व्यवसायानिमित्त पालघर जिल्ह्यात राहत असून अजमेर येथील प्रसिद्ध दर्ग्यात दर्शनासाठी जाणाऱ्या मुस्लिम समाजाव्यतिरिक्त अन्य समाजातील नागरिकदेखील जात असल्याने अजमेर-म्हैसूर गाडीला थांबा मिळावा, अशी त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. खासदार गावित, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, खा. श्रीरंग बारणे आदींच्या संयुक्त प्रयत्नांनी तसेच पालघर हा जिल्हा झाल्याने रेल्वेच्या नियमानुसार जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वे गाड्यांना थांबा दिला जात असतो, त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी थांबा देण्याचे मान्य केले.
पश्चिम रेल्वेने गेल्या सहा महिन्यांत पालघर स्थानकात सात लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा दिला असला तरीदेखील मुंबईकडे दैनंदिन प्रवास करणाऱ्या रेल्वेप्रवाशांसाठी लोकलसेवेत वाढ करून मिळावी, या मागणीकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. वांद्रे टर्मिनसवरून सुटणारी वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्स्प्रेस ही गाडी सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी पालघर येथे सकाळी ९.१८ वाजता थांबणार आहे आणि हीच गाडी परतीच्या प्रवासात बुधवार, गुरुवार, शनिवार व रविवार या दिवशी पालघर येथे दुपारी ४.१८ वाजता थांबणार आहे. तसेच अजमेर-म्हैसूर ही गाडी रविवार आणि शुक्रवार या दिवशी पालघर येथे थांबणार असून ही गाडी रात्री ९: ५५ मिनिटांनी पालघर स्थानकात थांबेल, तर म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस ही गाडी दर बुधवार व शुक्रवारी पालघर येथे रात्री ११:३६ वाजता थांबणार आहे.
या गाड्यांना सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. वलसाडपर्यंत येणारी इंटरसिटी एक्स्प्रेस डहाणूपर्यंत आणण्यात यावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. वसई रोड, विरार, पालघर, डहाणू या रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण, स्थानकात सरकते जिने व पुलांची पुन्हा नव्याने उभारणी, त्याचप्रमाणे पालघर, नवनगर, इतर ठिकाणी उड्डाणपुलाच्या उभारणीसंदर्भात प्रशासकीय पातळीवर काम सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले होते. येत्या काही महिन्यांत या भागाला वाढीव उपनगरी सेवा तसेच वाढीव बेटाकडे जाणाऱ्या नागरिकांना रेल्वेपुलावरून जाण्याकरता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गावित यांनी यावेळी सांगितले.