अ‍ॅपशहर

वाहनतळ उभारूनही दुचाकी रस्त्यावरच

अंबरनाथ येथील शिवाजी चौक भागातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या ठिकाणी उभारलेल्या इमारतीच्या तळमजल्यातील वाहनतळ वाहनांच्या प्रतीक्षेत आहे.

Maharashtra Times 12 Oct 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two wheelers parked on roads instead of parking in ambernath
वाहनतळ उभारूनही दुचाकी रस्त्यावरच


अंबरनाथ येथील शिवाजी चौक भागातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या ठिकाणी उभारलेल्या इमारतीच्या तळमजल्यातील वाहनतळ वाहनांच्या प्रतीक्षेत आहे. या वाहनतळाची क्षमता मोठी असली तरी दुचाकीस्वार दुचाकी रस्यावरच पार्क करत आहेत. याविरोधात पालिकाही ठोस पाऊले उचलत नसल्याने स्टेशन परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न तसाच आहे.

अंबरनाथ स्टेशन परिसरातील पूर्व भागातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या ठिकाणी उभारलेल्या इमारतीचे काम रखडले असले, तरी नागरिकांचा आक्रोष आणि पालिकेवर वाढता दबाव पाहता तळमजल्यातील जागेत एक महिन्यापूर्वी दुचाकींसाठी पार्किंग सुरू करण्यात आली. येथे जवळपास एक हजार दुचाकी पार्क करण्याची क्षमता आहे. सुरुवातीला यासाठी अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत दुचाकीधारकांना नगरपालिकेच्या पार्किंग इमारतीत वाहने पार्क करण्यासाठी आवाहन केले. त्यामुळे स्टेशन परिसरातील रस्त्यांवर लागलेल्या दुचाकी सुरुवातीचे काही दिवस नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये पार्क करण्यात आल्या. त्यामुळे स्टेशन परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र काही दिवसांतच दुचाकीधारकांनी पालिकेच्या पार्किंगकडे पाठ फिरवली आहे.

त्यामुळे पालिकेने उभारलेल्या पार्किंगमध्ये कमी आणि पुन्हा स्टेशन परिसरातील रस्त्यांवरच अधिक दुचाकी पार्क केलेल्या आढळत आहे. सर्वच वर्दळीच्या रस्त्यांवर रांगेत दुचाकी पार्क केल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न स्टेशन परिसरात कायम आहे.

त्यात दिवाळीचे दिवस असताना, एकीकडे रस्त्यांवर दुचाकींची अडचण, तर दुसरीकडे फेरीवाल्यांचा गराडा यामुळे स्टेशन परिसरातील कोंडीत अधिक भर पडत आहे. पालिकेने सुरू केलेल्या पार्किंगचा उपयोग काय, असा प्रश्न नागरीक उपस्थित आहेत.

याबाबत नगरपालिकेचे अधिकारी सचिन गायकवाड यांना विचारले असता, सध्या पार्किंगची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र पालिकेचे कर्मचारी पार्किंगचा कारभार पाहत आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच सध्या काही उपाययोजना नसल्याचे त्यांनी मान्य केले. रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या दुचाकींबाबत आरटीओकडे पत्रव्यवहार करत त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले जाईल, असेही गायकवाड म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज