म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
अर्बन डेव्हलपमेंट नियमावलीत एखाद्या इमारतीत १० टक्के एमिनिटी स्पेस ठेवण्याची तरतूद होती. मात्र महाविकास आघाडीने ही जागा गच्चीवर ठेवण्याची मुभा विकासकांना दिली आहे. त्यामुळे विकासक आता ही जागाही वापरतील. त्याचा फटका अंबरनाथ, बदलापूरसारख्या चौथ्या मुंबईच्या शहरांना बसेल, अशी भीती भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गेल्या काही वर्षांत झपाट्याने नागरीकरण होते आहे. त्यामुळे या शहरांमध्ये मोकळ्या जागा ठेवण्याची गरज आहे. मात्र या शहराचे नियोजन होताना दिसत नाही. नागरिकांच्या फायद्याचे नियम आणण्याचे सोडून राज्यातील महाविकास आघाडी विकासकधार्जिणे निर्णय घेत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला. नव्याने अर्बन डीसी नियमांमध्ये महाविकास आघाडीने वेगवेगळे बदल केले आहेत. हे बदल या वाढत्या शहरांसाठी धोक्याचे असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. अंबरनाथ येथील एका नवउद्योजकाच्या कंपनीच्या उद्घाटनाप्रसंगी ते आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. यापूर्वीच्या अर्बन डिसी नियमावलीत एमिनिटी स्पेससाठी जमिनीवर किमान १० टक्के ठेवण्याचे बंधन होते. मात्र आघाडी सरकारने यात बदल केले आहेत. नव्या नियमानुसार टेरेसवर एमिनिटी स्पेस ठेवण्याची मुभा महाविकास आघाडीने दिली आहे. याचा गैरफायदा विकासक घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंबरनाथसारख्या शहरातील मुलांना आवश्यक असलेल्या मैदानांचा बळी घेतला जाईल, असा आरोप शेलार यांनी केला.