अ‍ॅपशहर

वसई तालुक्यातील ग्राहकांची तक्रार

आज मोबाइल व लँडलाइन कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा असताना, ग्राहकांना चांगली सेवा देऊन टिकवून ठेवण्याऐवजी वसई तालुक्यातील बीएसएनएलचा कारभार ढासळतच चालल्याने अनेक ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहेत.

Maharashtra Times 16 Feb 2017, 4:01 am
बीएसएनएलचा कारभार रेंजबाहेर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vasai bsnl customers complain bad service
वसई तालुक्यातील ग्राहकांची तक्रार


म. टा. वृत्तसेवा, वसई

आज मोबाइल व लँडलाइन कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा असताना, ग्राहकांना चांगली सेवा देऊन टिकवून ठेवण्याऐवजी वसई तालुक्यातील बीएसएनएलचा कारभार ढासळतच चालल्याने अनेक ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहेत. काही दूरध्वनी केंद्रात ग्राहकांना टेलिफोन बिले वेळेवर मिळत नाहीत, फक्त एसएमएसवर पाठवली जातात. ग्राहकांनी बिलाचा आग्रह धरल्यास कम्प्युटर बिघडला आहे, अशी उत्तरे दिली जातात, असे विरारमधील एका ग्राहकाने सांगितले.

आज फार जुने ग्राहक थोड्या फार प्रमाणात बीएसएनएल सेवा वापरतात. सरकारी कार्यालयांमध्ये बीएसएनएलचेच फोन आहेत. मात्र चांगली सेवा देण्यास भारत संचार निगम कमी पडत असल्याची तक्रार ग्राहक करीत आहेत. अनेक ग्राहकांना दूरध्वनी बिलांचा भरणा करण्यासाठी वेळ काढून दूरवर दूरध्वनी केंद्रात जाणे शक्य नसते, ग्राहकांना महिन्याची बिले वेळेवर मिळावीत, ही साधी अपेक्षा भारत संचार निगम पूर्ण करू शकत नाही का ? असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला आहे.

बीएसएनएलचे मोबाइल अधुनमधून बंद असतात. खरे तर, दुर्गम भागात एकेकाळी बीएसएनएलची मोबाइल सेवा इतर खासगी मोबाइल कंपन्यांपेक्षा अधिक कार्यक्षम होती. बीएसएनएलच्या फोनला सर्वत्र नेटवर्क मिळायचे.

मात्र आता अनेक ठिकाणी घराबाहेर आल्यानंतरच मोबाइल सुरू असतो. घरात रेंज मिळत नाही, अशी तक्रार आहे. शहरात कुठे खोदकाम झाले की, फोन बंद पडतात, अशीही तक्रार आहे.

खासदारांनी लक्ष घालण्याची अपेक्षा

बीएसएनएल सेवा सवयीची असल्यामुळे अनेक ग्राहक इतर कंपन्यांच्या सेवेच्या विचार करीत नाहीत. बीएसएनएलने लवकरच आपली मोबाइल, लँडलाइन तसेच इंटरनेट सेवा अधिक चांगली द्यावी. दूरध्वनी केंद्रातून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण झटपट करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशीही वसई तालुक्यातील बीएसएनएलच्या ग्राहकांची अपेक्षा आहे.

ग्राहकांच्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन त्याचे निराकरण करणे बीएसएनएलला शक्य होत नाही. बीएसएनएलची सेवा देणारी यंत्रणा नेहमीच अपुरी असते. साधी बिल पठविण्याची व्यवस्था सुधारलेली नाही. बीएसएनएलकडून संच मिळत नाही. सेवा वारंवार खंडीत होते.

- निरंजन राऊत,

बीएसएनएल ग्राहक, विरार पूर्व

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज