म. टा. वृत्तसेवा, कल्याण
ठाणे वन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वनमहोत्सवाचा प्रारंभ कल्याण तालुक्यातील छोट्याशा वरप गावातून होणार असल्यामुळे या गावाचा चेहरामोहरा अचानक बदलला. त्यातच गुरुवारच्या विमान दुर्घटनेनंतर खबरदारी म्हणून मुख्यमंत्री रस्ता प्रवास करणार असल्याने एका रात्रीत संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. अनेक वर्षांपासून वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरलेला म्हारळ-वरप रस्ता चकचकीत होऊ लागला आहे.
राज्य सरकारच्या ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातर्गत जुलै महिन्यात राज्यभरात १३ कोटी वृक्षांची लागवड केली जाणार असून या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते केला जाणार आहे. कल्याण तालुक्यातील वरप हा आदिवासी पाडा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावातून जाणाऱ्या मुरबाड मार्गावर खड्डे पडत असल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले होते. परंतु या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कायम होते. आता वरप गावात मुख्यमंत्री येणार असल्यामुळे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, वनाधिकारी यांच्यासह सरकारी अधिकाऱ्यांच्या फौजफाटा गावाचा चेहरामोहरा बदलण्यात व्यग्र झाला आहे. मुख्यमंत्री रस्तेमार्गाने येणार असल्याने प्रशासनाने शुक्रवारी सकाळपासून संततधारेने पडणाऱ्या पावसाची पर्वा न करता दुर्लक्षित रस्त्यावरील खड्डे बुजवून तो चकाचक करण्याचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे राधाश्रम आश्रमाच्या मागील बाजूला असलेल्या वन विभागाच्या जागेवर हे वृक्षारोपण केले जाणार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी राधाश्रमाने बंद केलेला आदिवासींचा रस्ता मोकळा करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर हा रस्ता आदिवासींसाठी सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी वरप गावातील रहिवाशांकडून केली जात आहे.