बाजारभाव नसल्याने आदिवासी शेतकरी हवालदिल
मच्छिन्द्र आगिवले, वाडा
करोनामुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उद्योगांना खीळ बसली, कामगारांना काम मिळेनासे झाले आहे. शेतकऱ्यांना तर मोठा फटका बसला आहे. विविध पिकांचे नुकसान झाले असून फुलशेती तर पूर्णपणे संपुष्टात आली. एकेकाळी मोगऱ्याच्या उत्पादनाने स्थिरस्थावर झालेल्या वाडा व विक्रमगड आदिवासी शेतकऱ्यांसमोर तर मोठा आर्थिक पेच निर्माण झाले आहे. मागणीच थांबल्याने जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
वाडा व मोखाडा तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या आमले गावातील जवळपास ४१ आदिवासी शेतकरी मोगऱ्याचे उत्पादन घेतात. या मोगऱ्याच्या उत्पादनाने अनेक वर्षे दुर्लक्षित व बेरोजगारीने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्नाचा उत्तम पर्याय निर्माण झाला. विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या उंबरवांगण, साखरे, पोचाडा, वाकी, या ठिकाणी शेकडो आदिवासी शेतकऱ्यांनी मोगरा लावला. मोगऱ्याचे दररोज साधारण ५ ते १५ किलो उत्पादन घेतले जाते. प्रतिकिलो ३०० ते ५०० रुपये इतका दर मोगऱ्याला मिळतो. दादर व नाशिक या ठिकाणी या मोगऱ्याला मागणी आहे. म्हणूनच या मोगऱ्याच्या शेतीमुळे आदिवासी नागरिकांच्या जीवनात सुगंध दरवळला होता. मोगरा दारात लावल्याने स्थलांतर थांबले असून वर्षानुवर्षे सुरू असलेल्या भटकंतीला पूर्णविराम मिळाला, मात्र आता या शेतकऱ्यांवर होळीपासून पुन्हा संकट ओढवले असून करोना पार्श्वभूमीवर शेतीवरच गदा आली आहे. मंदिरे, बाजारपेठा बंद आहेत. लग्नसोहळे करण्यासही मनाई आहे. यामुळे फुलांची मागणीच थांबली असून फुलशेतीवर कुऱ्हाड कोसळली. मोगरा उत्पादकांवर हातावर हात घेऊन बसून राहण्याची वेळ आली आहे. आर्थिक गणित कोलमडले आहे. ऐन लग्नसराईत मोगऱ्यापासून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. लॉकडाउन उठेपर्यंत पावसाळा येईल, त्यांनतर मोगरा उत्पादन बंद होईल, त्यामुळे या वर्षीचा हंगाम वाया गेल्याचे शेतकरी सांगतात.
हैद्रराबाद येथून रोपे मागवून मोगरा या फुलशेतीची सुरुवात आम्ही सर्वप्रथम केली. त्यानंतर अनेक आदिवासी नागरिकांनी रोपे व मार्गदर्शन घेऊन आपल्या जीवनात मोगरा फुलविला, पण करोना आजाराने आम्हाला मोठा धक्का दिला. आम्हाला क्षणात बेरोजगार करून ठेवले आहे. स्वतःच्या पायावर व हिमतीवर आम्ही हा व्यवसाय उभा केला. नुकसान भरपाई तर सोडाच, पण सरकारी यंत्रणा फक्त कागदी घोडे नाचवत आहेत. फुलशेतीच्या प्रत्यक्ष योजना कुणाच्या घशात जातात, हा एक प्रश्नच आहे.
- संतोष बरफ, मोगरा उत्पादक शेतकरी
शेतीमालाची उत्पादकता वाढवावी
पालघर : या वर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पेरणीचे नियोजन करण्यासाठी सहकार्य करावे व पिकांची उत्पादकता वाढवावी, असे निर्देश कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाला दिले. खरीप २०२० हंगामापूर्व जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. कृषी विभागाने पुढील वर्षाचे चांगले नियोजन केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेताना नवनवीन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यासाठी विभागाने प्रयत्न करावेत, मागील वर्षी योजना राबविताना आलेल्या अनुभवानुसार ज्या योजनांचा शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल, अशा योजनांसाठी अधिक प्रयत्न करावेत, असे भुसे म्हणालेृ.