म. टा. प्रतिनिधी, ठाणे
घरातून पळण्याअगोदर महिलेने लग्न केले आणि नंतर पहिल्या पतीच्या घरातून किंमती वस्तू आणि पैसे घेऊन ही महिला पसार झाल्याचा अनोखा प्रकार भाईंदरमध्ये समोर आला आहे. या महिलेसह तिचा दुसरा पती अशा एकूण तिघांविरुद्ध भाईंदर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पानाची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या भाईंदर येथील २७ वर्षीय युवकाचे इलाहाबाद येथील मुलीशी विवाह झाला होता. लग्नानंतर हा युवक मुंबईला आला. तर त्याची पत्नी गावी होती. मात्र दोन महिन्यांपूर्वी पत्नी एका मुलीला सोबत घेऊन भाईंदरमध्ये पतीच्या घरी राहण्यासाठी आली. तिने ही मावशीची मुलगी असल्याचे पतीला सांगितले होते. ५ सप्टेंबर २०१८ रात्री जेवण केल्यानतंर सर्वजण झोपले. मात्र पहाटे चार वाजता युवकाला जाग आल्यानंतर पत्नी, तसेच मुलगी आणि मुलगा घरात नसल्याचे निदर्शनास आले. त्याने आसपास शोध घेतला. गावीही चौकशी केली. मात्र न सापडल्याने अखेर युवकाने तिघेही हरवल्याची पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र पत्नीने घरातून जाताना एक लाखांची रोकड तसेच काही दागिने घेऊन गेली होती. भाईंदर पोलिसांच्या चौकशीत ही महिला मुलासोबत तिच्या माहेरी असल्याची बाब समोर आली. तसेच तिने सासरी येण्यास नकार दिला. याबाबत युवकाने अधिक चौकशी केली असता पत्नीसोबत घरी आलेली मुलगी तिची कोणत्याही प्रकारे नातेवाईक नव्हती. तसेच तिने एका व्यक्तीबरोबर विवाह केला होता. पत्नीच्या दुसऱ्या लग्नाची पतीला काही कागदपत्रेही हाती लागले आहेत. या फसवणुकीप्रकरणी युवकाने न्यायालयात धाव घेतली होती. तसेच पत्नीसोबत घरी आलेली मुलगी तिच्या दुसऱ्या पतीची बहीण असून न्यायालयाच्या आदेशानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.