ऐतिहासिक शहर 'वारसा' विना भाग ३
ashish.pathak@timesgroup.com
@ashishpMT
कल्याण : कल्याण व आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय, प्राचीन वास्तू, प्रार्थनास्थळे व किल्ले सहज राज्य किंवा केंद्र सरकारच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट होण्याजोगे असले तरी निव्वळ त्याबाबतच्या अनास्थेमुळे त्यांचे संवर्धन होऊ शकलेले नाही. संवर्धनाअभावी आपल्या वैभवशाली इतिहासाचा हा वारसा नामशेष होऊ लागला आहे. आश्चर्य म्हणजे या कामासाठी एमएमआरडीएने निधी देण्याची तयारीही दर्शवली होती. परंतु हेरिटेज वास्तूंबद्दलच्या अनास्थेमुळे हा निधीही मिळू शकलेला नाही.
पुण्यातील शनिवारवाड्याचा आजही पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने पर्यटक येतात. या वाड्याचे संवर्धन उत्तमपणे केले जाते. याच वाड्याच्या आधीचा कल्याणातील प्रसिद्ध सुभेदारवाडा मात्र पाडण्यात आला. तो वाचवण्याचे कल्याण हेरिटेज सोसायटीने प्रयत्न केले, पण ते यशस्वी ठरू शकले नाहीत. वास्तविक ही वास्तू कल्याणकर वाचवू शकले असते, तर त्या जोरावर कल्याण हे पर्यटनस्थळ म्हणून लौकीक कमवू शकले असते. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा पारनाका येथील वाडा, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वास्तव्य झालेली गुहा तसेच त्यांचे आजोळ असलेला कल्याणातील वाडा हेदेखील आता नामशेष झाले आहेत. या वास्तू पाडण्याऐवजी मालकांना विश्वासात घेऊन त्यांचे संवर्धन शक्य होते. पण त्यासाठी कोणी पुढाकारच घेतला नाही.
ठाणे व रायगड जिल्ह्यातील हेरिटेज वास्तू निश्चित करून त्यांच्या संवर्धनासाठी निधी देण्याची तयारी एमएमआरडीएने दर्शवली होती. त्यासाठी कल्याणातील अशा वास्तू ठरवण्याची जबाबदारी केडीएमसीवर सोपवण्यात आली. कल्याणकरांचे महापालिकेत प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी ही यादी फेटाळून तर लावलीच, पण त्यापैकी एकाही वास्तूचे संवर्धन व्हावे, यासाठी प्रयत्न केले नाहीत. कल्याणातील काळा तलाव ही ऐतिहासिक वास्तू. मात्र या तलावाचा इतिहास त्या परिसराचे सुशोभीकरण करताना कोठेही लिहिलेला नाही. हा इतिहास लाइट, साउंड शोद्वारे दाखवला तर तो पर्यटन केंद्र ठरू शकेल. पण स्वतःची नावे कोरण्यापुरतीच मर्यादित इच्छा असणाऱ्या लोकप्रतिनिधींना याचे भान असणे आवश्यक आहे.
निधीची कमतरता नाही
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने एखाद्या वास्तूला संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याआधी त्याच्या संवर्धनावर येणाऱ्या खर्चाला मंजुरी मिळालेली असते. त्यामुळे या विकासासाठी निधीचा अडसर नसतो.
बऱ्याच हेरिटेजपात्र खासगी वास्तूंच्या देखभालीचा खर्च आवाक्याबाहेरचा असतो. देखभालीअभावी त्या मोडकळीला येतात व त्यांचा पुनर्विकास करण्याशिवाय पर्याय नसतो. पुनर्विकास केल्यावर मिळणारा मोबदला हा इतका जास्त असतो की अनेकदा हाच पर्याय निवडला जातो.
- उमेश नगरकर, सचिव, वारसा संवर्धन समिती, मुंबई