वसईतील नागरिक संभ्रमात
म. टा. वृत्तसेवा, वसई
पोलिओ डोस देण्यासाठी येत असलेल्या काही व्यक्तींकडे ओळखपत्र नसल्याने वसईतील नागरिक संभ्रमात पडले आहेत. वसईत एका ठिकाणी पोलिओ डोस देण्यासाठी आलेल्या चौघांकडे ओळखपत्रच नसल्याने नागरिकांनी त्यांना परत पाठवले. पोलिओ डोस देण्यासाठी आलेली दोन मुले तर चक्क अल्पवयीन होती. त्यामुळे या व्यक्ती खरेच पोलिओ डोस देण्यासाठी आल्या होत्या की चोरीच्या उद्देशाने आल्या होत्या, अशी शंका उपस्थित होत आहे.
वसईत नुकतीच २० व्यावसायिक कार्यालयांत चोरी झाल्याची घटना घडली आहे. तर, दुसरीकडे विरारमध्ये आणि वसई पश्चिमेकडील अनेक सोसायट्यांमध्ये चोरीच्या झालेल्या घटना ताज्या आहेत. त्यामुळे वसई-विरारमधील नागरिक सतर्क झाले आहेत. मात्र अशातच वसई पश्चिमेच्या आनंद नगर येथील गिरीविहार सोसायटीत बुधवारी दुपारी पोलिओ डोस देण्यासाठी दोन अल्पवयीन मुले आली होती. येथील स्थानिकांनी सुरक्षिततेच्या उद्देशाने त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले असता त्यांच्याकडे ते नव्हते. यासाठी त्यांनी या दोन्ही मुलांकडे कोणी पाठवले आहे, याची चौकशी करत त्या मुलांना परत पाठविले. त्यानंतर पोलिओ डोस देण्यासाठी एक महिला आणि एक पुरुष असे दोन स्वयंसेवक आले. मात्र त्यांच्याकडेदेखील ओळखपत्र नसल्याने येथील स्थानिकांनी महापालिका प्रशासनाकडे तात्काळ तक्रार केली आहे.
'आमच्या सोसायटीमध्ये नुकतीच चोरीची घटना घडली होती. त्यामुळे ही आलेली दोन्ही अल्पवयीन मुले नक्की कोणत्या उद्देशाने आली आहेत, याबाबत आम्ही चौकशी केली. तसेच, प्रत्येकवेळी सिस्टर येऊन पोलिओ डोस देतात, मात्र आज अचानक अल्पवयीन मुले कशी? ही मुले पोलिओ डोस देण्यासाठी आली आहेत हे कसे ओळखावे? यासाठी त्यांच्याकडे ओळखपत्र द्यावे, अशी आम्हा सामान्य नागरिकांची मागणी असल्याचे येथील स्थानिक विजय ठाकूर यांनी सांगितले. तर, याबाबत महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. तबस्सूम काझी आणि अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
अल्पवयीन मुलांच्या हाती पोलिओ डोस देण्याचा कारभार दिल्याने लहान मुलांच्या आरोग्याचा तसेच, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुलांतर्फे कमी अधिक प्रमाणात पोलिओ डोस दिला गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल येथील स्थानिकांनी केला आहे. तसेच, त्यांच्या जागी उद्या दुसरे कोणी येऊन पोलिओ डोसच्या नावाखाली दुसरे काही मुलांना देऊन गेल्यास आम्ही काय करावे, असेदेखील येथील स्थानिक नितांत राऊत यांनी सांगितले.