ठाण्यात रंगणार संमेलन
म. टा. प्रतिनिधी,ठाणे
हातातल्या लेखणीच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या मुक्त व्यासपीठावर क्लिकद्वारे व्यक्त होणाऱ्या लेखिकांचे संमेलन ठाण्यात भरणार आहे. संवेदनशील विषयांपासून समस्यांवर परखड टिका करणाऱ्या 'आम्ही लेखिका' या ग्रुपमधील ठाणे जिल्ह्यातील लेखिका मंगळवार, १९ फेब्रुवारी रोजी एकत्र येत असून यानिमित्ताने साहित्य क्षेत्रातील लेखिकांचे स्थान तसेच नवीन प्रवाह यांचा वेध घेतला जाणार आहे.
कथा, कादंबऱ्या असोत किंवा सभोवताली घडणाऱ्या घटनांचा वेध घेणारे लिखाण असो, हे सर्व शब्दबद्ध करणाऱ्या लेखिका सोशल माध्यमांच्या सहाय्याने एकत्र आल्या. मोहन कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून २०१८ साली 'आम्ही लेखिका' हा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाला. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देशाविदेशातील तब्बल दोन हजार लेखिकांचा समावेश आहे. या ग्रुपच्या निमित्ताने साहित्यविषयक विविध उपक्रम हाती घेण्यासाठी वेगवेगळे जिल्हास्तरीय ग्रुप तयार करण्यात आले. एक-एका लेखिकेवर त्याची जबाबदारी सोपविण्यात आली. यापैकी ठाणे जिल्हा ग्रुपचे पहिले संमेलन पुढील आठवड्यात ठाण्यात भरविण्यात येणार आहे.
ठाणे जिल्हा मेळावा हा या साहित्य चळवळीतील पहिला टप्पा असल्याचे सदस्यांकडून सांगण्यात येते. आम्ही लेखिका आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्यातर्फे ही मोहीम जिल्ह्यात सुरू झाली असून यासाठी मोठ्या संख्येने लेखिकांशी संपर्क साधण्यात येत आहे. पद्मा होशींग, सुनिला मोहनदास आणि वृषाली शिंदे या जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत आहेत. या पहिल्या संमेलनाचे उद्घाटन लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांच्या हस्ते होणार आहे. 'आम्ही लेखिका' ग्रुपचे संस्थापक मोहन कुलकर्णी आणि वक्तृत्वपटू देविका पाटील यांची विशेष उपस्थिती असेल. या निमित्ताने या ग्रुपचा प्रवास उलगडणार असून 'कुसुमाग्रजांच्या कविता' या विषयावर ग्रुपमधील लेखिकांची सादीरकरणे होणार आहेत. त्यासह कथाकथनाचे सत्र होणार असून साहित्य क्षेत्रातील नव्या प्रवाहांविषयी लेखिकांना माहिती व्हावी यासाठी आजची कविता या विषयावरचे खास तरुणांचे सत्र होणार आहे.
चळवळ समृद्ध व्हावी
ठाण्यातील मो. ह. विद्यालयातील पहिल्या मजल्यावरील वाचनालय सभागृहात मंगळवारी दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत हा कार्यक्रम रंगणार आहे. मराठी लेखिकांना एकत्र करून साहित्य चळवळ अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न या संमेलनाच्या माध्यमातून केला जात असल्याचे कोमसापच्या अध्यक्षा मेघना साने यांनी सांगितले.