अ‍ॅपशहर

पुरस्कार कुणासाठी?

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने आपल्या युवा धोरणामध्ये दरवर्षी जिल्हास्तरीय युवा पुरस्कार देण्याची घोषणा केली. मात्र, गुणवत्ता असूनही या पुरस्कारांसाठीच्या निकषांची पूर्तता करण्यात ठाण्यातील युवक फारसे प्रयत्नच करत नसल्याने गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील एकाही गुणवंत तरुणाला हा पुरस्कार मिळू शकलेला नाही.

Maharashtra Times 1 Jul 2016, 4:00 am
राज्य सरकारचे युवा पुरस्कार युवकांच्या प्रतीक्षेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम youngsters are not keen to receive award
पुरस्कार कुणासाठी?


पंकज चव्हाण , ठाणे

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने आपल्या युवा धोरणामध्ये दरवर्षी जिल्हास्तरीय युवा पुरस्कार देण्याची घोषणा केली. मात्र, गुणवत्ता असूनही या पुरस्कारांसाठीच्या निकषांची पूर्तता करण्यात ठाण्यातील युवक फारसे प्रयत्नच करत नसल्याने गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील एकाही गुणवंत तरुणाला हा पुरस्कार मिळू शकलेला नाही.

राज्य सरकारच्या धोरणानुसार हा पुरस्कार जिल्ह्यातील एक युवती, एक युवक आणि एक संस्था यांना देण्यात येतो. गेल्या तीन वर्षांत या पुरस्कारांसाठी १० युवक, एक युवती आणि एक संस्था यांनी जिल्हा क्रीडा विभागाकडे प्रस्ताव पाठवले होते. मात्र सन २०१४-१५ साली पाठवण्यात आलेले प्रस्ताव ठरवून दिलेला निकष पूर्ण करू शकले नाहीत. परिणामी ते बाद ठरले. त्यामुळे त्या वर्षी हा पुरस्कार जाहीर होऊ शकले नाहीत.

हा पुरस्कार मिळवण्यासाठी युवक, युवतीचे वय १३ वर्ष पूर्ण व पस्तीस वर्षापर्यंत असावे, जिल्ह्यात पाच वर्ष वास्तव्य असावे आणि त्यांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे असणे आवश्यक आहे. संबंधितांनी समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती व जनजाती आदिवासी भाग या घटकांसाठी काम करणे गरजेचे आहे. तसेच शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान-तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण, व्यसनमुक्ती यापैकी एका क्षेत्रात कार्य केलेले असावे, अशा अटी आहेत. मात्र सादर करण्यात आलेल्या पुरस्कार अर्जदारांनी या निकषांची पूर्तता केली नाही, अशी माहिती क्रीडा अधिकारी अमृता वाड यांनी ‘मटा’ला दिली. त्यामुळे काम करूनही केवळ कागदोपत्री नोंद न ठेवल्याने या पुरस्कारांपासून युवावर्ग वंचित राहत आहे.

हा पुरस्कार युवतींनाही दिला जातो. मात्र मागील तीन वर्षांत एकाच युवतीने या पुरस्कारासाठी अर्ज सादर केला होता. त्यामुळे या पुरस्काराकडे युवतींनी पाठ फिरवल्याचेच चित्र आहे.

यंदा फक्त पाचच प्रस्ताव

यंदाही या पुरस्कारासाठी फक्त पाचच प्रस्ताव आले असून या प्रस्तावाची अजून पडताळणी झालेली नाही. ३१ मेपर्यंत या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याची मुदत होती. मात्र पाचच युवकांनी हे प्रस्ताव सादर केला असून यावर्षी एकाही युवतीची पुरस्कारासाठी शिफारस आलेली नाही.


जिल्ह्यातील युवावर्ग हा उत्तम काम करत आहे. मात्र केलेल्या कामाची ते कागदोपत्री नोंद ठेवत नाहीत. त्यामुळे या पुरस्काराचे निकष पूर्ण करता येत नाहीत. परिणामी काम करूनही असे युवक या पुरस्कारापासून वंचित रहात आहेत.

अजित कारभारी, राज्य युवा पुरस्कार प्राप्त

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज