उद्दिष्ट आणि वसुलीत नऊ टक्क्यांची तफावत
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात डिसेंबरअखेर वीजबिल वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसुली यात जवळपास नऊ टक्क्यांची तफावत आढळून आली आहे. वसुलीचे लक्ष्य शंभर टक्के गाठण्यासाठी 'शून्य थकबाकी' मोहीम राबवून मार्चपर्यंत कोकण प्रादेशिक विभाग वीजबिल थकबाकीमुक्त करावा, असे सक्त निर्देश विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत.
प्रादेशिक संचालक नाळे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विभागातील कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडळाचे मुख्य इंजिनीअर, सर्व सुप्रिटेण्डण्ट इंजिनीअर आणि एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर यांच्यासमवेत नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत विविध निर्देश दिले. महावितरणच्या एकूण महसुलात जवळपास ४३ टक्के योगदान देणाऱ्या कोकण विभागाच्या वसुलीतील नऊ टक्के फरक हा गंभीर परिणाम करणारा आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करावा आणि वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करून थकबाकी शून्यावर आणावी, मुख्य कार्यालयाकडून येणाऱ्या यादीतील सर्व थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करावा., लघुदाब वाहिनीवरील वीजहानीचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, वीजचोरांविरुद्ध सुरू असलेली मोहीम आणखी तीव्र आणि व्यापक करावी, वीजपुरवठा खंडित होण्याचे विशेषतः औद्योगिक क्षेत्रातील प्रमाण कमी करावे, नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून तातडीने बदलावेत. सिंगल फेज मीटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून प्रलंबित नवीन वीजजोडणी वेळेत द्यावी. मार्चपर्यंतच्या नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीज बंद ठेवण्याबाबतची माहिती प्रणालीत भरावी, जेणेकरून ग्राहकांना वीज बंद संदर्भात 'एसएमएस'द्वारे लवकर पूर्वकल्पना देता येईल. कृषी वाहिन्यांवरील विद्युत भारात वाढ होत असून अशा वाहिन्यांवर अनधिकृत वीजवापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) उर्वरित कृषिपंपांना वीजजोडणी देण्याच्या कामांना गती देण्याबाबत निर्देश नाळे यांनी दिले. विविध योजनांमधून सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावाही त्यांनी घेतला.
कोकण प्रादेशिक विभागात कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडळातील १५ जिल्ह्यांचा समावेश होतो. डिसेंबर २०१९अखेर विभागात वीजबिलाची ५५७ कोटी रुपयांची थकबाकी असून थकीत बिलाच्या वसुलीसाठी १ जानेवारीपासून आतापर्यंत १९ हजार २२८ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता किंवा कायमचा खंडित कारण्यात आला आहे. तर, नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात विभागात विजेचा चोरटा तसेच अनधिकृत वापर करणाऱ्या १ हजार ३७१ जणांविरुद्ध कारवाई करून आठ कोटी १० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. यातील ८४३ जणांकडून एक कोटी ५१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
वीजबिल वेळेत भरा
कोकण प्रादेशिक विभागात गेल्या १५ दिवसांत थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या १७ हजार २६२ ग्राहकांनी २२ लाख रुपयांचे पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे विजबिलाचा वेळेत भरणा करून संभाव्य गैरसोय टाळावी व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी ग्राहकांना केले आहे.