नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण
म. टा. वृत्तसेवा, पालघर
हुतात्मा दिनी, १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात तसेच सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. ही निवडणूक रद्द करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून जोर धरू लागली आहे.
१४ ऑगस्ट, हुतात्मा दिन हा तालुका आणि जिल्हावासीयांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. १९४२ मध्ये याच दिवशी पालघर येथे निघालेल्या मूक मिरवणुकीवर ब्रिटीश सैनिकांनी केलेल्या गोळीबारात तालुक्यातील पाच तरुण शहीद झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी जिल्ह्यातील नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी मूक मिरवणुकीने पालघर येथे उभारलेल्या हुतात्मा चौकात जमतात तेथे प्रार्थना होऊन कार्यक्रम संपतो.
विशेष म्हणजे येत्या १४ ऑगस्टला या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने हा हुतात्मा दिन मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, असे प्रयत्न सुरू आहेत. मात्र याच दिवशी जिल्हा परिषदेसारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठेवल्याने जिल्हा प्रशासनाने या दिवसाचे गांभीर्य लक्षात घेतलेले नाही, अशी भावना येथे निर्माण झाली आहे. या दिवसाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने हा निवडणूक कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी होत आहे.