अ‍ॅपशहर

गांधींपुढे इंग्रज टिकू शकले नाही, तिथे तुमची काय बिशाद? : मंत्री सुनील केदार

दीडशे वर्षे राज्य करणारे इंग्रज गांधी विचारधारेपुढे टिकू शकले नाहीत. तिथे छोटी मोठी विचारधारा गांधी विचारांपुढे टिकूच शकत नाहीत, असं म्हणत मंत्री सुनील केदार यांनी भाजपवर नाव न घेता निशाणा साधला.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 30 Jan 2022, 6:11 pm
वर्धा : दीडशे वर्षे राज्य करणारे इंग्रज गांधी विचारधारेपुढे टिकू शकले नाहीत. तिथे छोटी मोठी विचारधारा गांधी विचारांपुढे टिकूच शकत नाहीत, असं राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sunil kedar


महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री सुनील केदार यांनी सेवाग्राम आश्रमात गांधीजींना आदरांजली वाहिली. यावेळी मंत्री केदार यांनी बापू कुटीत मौन पाळून प्रार्थना केली. ज्या विचारधारेनं या देशातले सर्वसामान्य माणसाने एकत्र येऊन दीडशे वर्षातली गुलामगिरी दूर झाली आहे. त्या विचारधारेपुढे नतमस्तक होण्यासाठी येथे आल्याचे पालकमंत्री म्हणाले. तीच गांधी विचारधारा पुढेही या देशाला पुढे नेण्यासाठी सक्षम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काही लोकांनी या ठिकाणी आपले चुकीचे मनसुबे पुढे केले आहेत. त्यांना यश मिळणार नाही. त्यांनी एवढं समजावं की दीडशे वर्ष ज्यांनी राज्य केले ते गांधींच्या विचारधारेसमोर टिकू शकले नाही तिथे छोट्या मोठ्या विचारधारा काय टिकणार? राष्ट्रपित्याच्या प्रति आदर या राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला असलाच पाहिजे. त्यालाच आपण राष्ट्रप्रेम म्हणतो, असंही पालकमंत्री केदार म्हणाले.

पालकमंत्र्यांच्यासोबत यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, शिरीष गोडे यांची उपस्थिती होती. आश्रमातील प्रार्थनेनंतर आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन प्रभू यांच्यासोबत पालकमंत्र्यांनी सेवाग्राम विकास आराखडा संदर्भात चर्चा केली. सोबतच महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.

महत्वाचे लेख