अ‍ॅपशहर

हे चाललंय काय? परिवहन अधिकारी बजरंग खरमाटेंची सेवानिवृत्तीची पार्टी; आरटीओ अधिकारी, कर्मचारी दुपारी गायब

परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी सिव्हील लाइन्समधील एका हॉटलेमध्ये गुरुवारी सेवानिवृत्तीची पार्टी दिली. या पार्टीसाठी आरटीओ कार्यालयातील सारेच दुपारनंतर कार्यालयातून बाहेर पडले.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 26 Aug 2022, 9:02 am
लोगो : हे चाललेय काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rto


एकनाथ चौधरी, वर्धा

परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी सिव्हील लाइन्समधील एका हॉटलेमध्ये गुरुवारी सेवानिवृत्तीची पार्टी दिली. या पार्टीसाठी आरटीओ कार्यालयातील सारेच दुपारनंतर कार्यालयातून बाहेर पडले. कार्यालयात कुणीही नसल्याने रिकाम्या खुर्च्यांसाठी तेवढेच पंखे फिरत होते. कुणी तरी कार्यालयात असणार या आशेने जावून पाहणाऱ्यांना निराश होऊन बाहेर पडावे लागत होते. पार्टीसाठी 'आरटीओ'ला देण्यात आलेल्या या मनमर्जी सुट्टीने गावखेड्यातून कामानिमित्त आलेल्यांना मन:स्ताप सहन करावा लागला. यासंदर्भात सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी याकुब शेख यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

वर्ध्याच्या प्रशासकीय भवनात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. या कार्यालयात नागरिकांची सतत ये-जा असते. नियमाप्रमाणे गुरुवारीही सकाळच्या सुमारास हे कार्यालय उघडण्यात आले. परिवहन घोटाळ्यात नाव असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे नागपूरचाही प्रभार असल्याने ते वर्ध्याला क्वचितच येत असत. त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात फारसे कुणी त्यांना पाहिले नसल्याची चर्चा कार्यालय परिसरात होती. पण, खरमाटे यांनी या दिवसाचे औचित्य साधून कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पार्टीचे आयोजन केले. दुपारपासून पार्टीला सुरुवात होणार असल्याने कार्यालयात दाखल झालेले अधिकारी, कर्मचारी एक-एक करीत पार्टीसाठी निघू लागले. वरिष्ठ अधिकारीच पार्टीत असल्याने कनिष्ठांनी थांबून काय करावे, असे मनोमन ठरवित दुपारी १ वाजतापर्यंत संपूर्ण कार्यालय रिकामे झाले. आष्टी, हिंगणघाट, सेलू, देवळी परिसरातील नागरिक नेहमीप्रमाणे आपली कामे घेऊन कार्यालयात पोहचले. कार्यालयात कुणीही उरले नव्हते. कामकाजासाठी टेबलवर जाणाऱ्या प्रत्येकांना केवळ रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन होत होते. अधिकारी, कर्मचारी नसले तरी दिवे, पंखे आणि कम्प्युटर सुरू ठेवण्यात आले होते. या माध्यमातून शासकीय संपत्तीचा खुलेआम अपव्यय केला जात होता. तर तिकडे हॉलेटमध्ये अधिकारी आणि कर्मचारी पार्टीत गुंग होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सुट्टी होण्याच्या वेळेवर हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात पोहचले. तोवर कुणीही कामाच्या निमित्ताने आलेले कुणीही थांबलेले नव्हते.

कारवाईसाठी वाढतोय जोर

वर्धा जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर आहे. या कार्यालयातून वाहन चालविण्याचा परवाना, गाड्यांचे पासिंग आणि इतर कामे केली जातात. या कार्यालयात आल्यानंतर दलालांचा विळखा पडतो, अशा तक्रारी यापूर्वी झाल्या. अजूनही व्यवस्था सुधारली नसतानाच आता अधिकाऱ्यांच्या पार्टीसाठी दुपारीच कार्यालय सोडून अधिकारी, कर्मचारी गेल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

'आलिशान' गीत-संगीत

आलिशान हॉटेलात झालेल्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी 'सोचे की तुम्हे प्यार करे की नही...' हे गाणे गायले. सारेच गाण्यांवर थिरकत होते. पार्टी रंगात आली असतानाच आरटीओ कार्यालयात कुणी नाही म्हणून कामे सोडून गावगाड्यातून आलेले लोक कामाविनाच परतत होते.

महत्वाचे लेख