अ‍ॅपशहर

गरिबीचं जीणं आलं वाट्याला, १३ वर्षीय अंकुशकडून भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार

आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी काय करावे या विचारात तो होता. यातूनच त्याने सुरुवातीला गावातच दारोदार फिरून ब्रेड विक्रीचा व्यवसाय केला मात्र, त्याला त्यात तोटा झाला. त्यामुळे हताश न होता अंकुशने गावात भाजीपाला विकण्याचा विचार मनाशी पक्का केला.

Authored byम. टा. प्रतिनिधी | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 26 Dec 2021, 4:08 pm
रवी राऊत, यवतमाळ : अख्खे आयुष्य उलटूनही अनेकांना कष्टाची किंमत कळत नाही. त्यामुळे आळशी माणसाचं जीवन दुःखात व्यस्थित होते. मात्र ,आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथील तेरा वर्षीय चिमुकल्याला बालपणीच जगण्याचे संदर्भ कळले. यातूनच हा चिमुकला खेडोपाडी भाजीपाला विकून संसाराला हातभार लावतो आहे. अंकुश राजवाडे असे या १३ वर्षीय उद्यमशील चिमुकल्याचं नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 year old Ankush Rajwade helps his father by selling vegetables
१३ वर्षीय अंकुश राजवाडे भाजीपाला विकून वडिलांना मदत करतो.


आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथील हा चिमुकला जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकतो. आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही. गरिबाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाला घाम गाळावा लागतो. कष्टाच्या घामाचा सुगंधही आयुष्यात ऐश्वर्य घेऊन येत असतो. मात्र, कष्टाचं जीवनात किती मूल्य हे अनेकांना कळत नाही. मात्र अंकुशला बालपणातच हे मूल्य कळले. अंकुशच्या वडिलांकडे वडीलोपार्जित केवळ अडीज एकर कोरडवाहू शेती आहे. त्यातही दरवर्षी नापिकी कर्जबाजारीपणा पिच्छा सोडत नव्हता. त्यामुळे चिमुकल्या अंकुशच्या मनात विचारांचा कोलाहल सुरु झाला होता.

आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी काय करावे या विचारात तो होता. यातूनच त्याने सुरुवातीला गावातच दारोदार फिरून ब्रेड विक्रीचा व्यवसाय केला मात्र, त्याला त्यात तोटा झाला. त्यामुळे हताश न होता अंकुशने गावात भाजीपाला विकण्याचा विचार मनाशी पक्का केला. पहाटे पाच वाजताच घरुन आर्मीच्या भाजी मंडी तो पोचला. तिथून भाजीपाला विकत घेत लोंढे मध्ये त्यांनी गल्लोगल्लीत भाजीपाला विकणे सुरु केले. नऊ ते साडे नऊपर्यंत भाजी विकून त्यातून चांगली रक्कम हाती आल्याने तो आनंदात न्हाऊन निघाला. त्यानंतर दहा वाजताच शाळेलाही पोहोचला आता जणू त्यांचा हा दिनक्रम बनला आहे. शाळेतून आल्यानंतर सायंकाळी सुद्धा अंकुश गावात भाजीपाला विकतो. त्याच्या आवाजाची भुरळही अनेक महिलांना पडली आहे. आवाज ऐकताच भाजीपाला घेण्यासाठी महिला धावून येतात. इतकेच नाही तर अंकुशच्या कष्टाचे कौतुकही करतात.

भाजी विक्रीतून अंकुशची डायलॉगबाजी...

विकणाऱ्यांचे सडले वांगे खपतात, हा वैदर्भीय वाक्यप्रचार प्रसिद्ध आहे. अंकुशही तसाच बोलका आहे. त्याच्या प्रत्येक शब्दाय रसाळपणा भरलेला आहे. त्यातही तो उत्तमोत्तम विनोद बुद्धीचा आहे. भाजी विकताना "तो घे भाजी, खाय वं ,आजी अन् हो ताजी" असे म्हणून वृद्ध महिलांच्याही चेहऱ्यावर हास्य पेरतो. इतकेच नव्हेतर तर व्यसनाधीनतेवरही जणू तो प्रबोधनच करतो. ६० ते ७० रुपये तुम्ही देशी-विदेशीत घालता, तेवढेच पैसे भाजीपाला घालून पहा तुमचा पूर्ण परिवार घळघळ खाईल, असाही तो संदेश देतो.

महत्वाचे लेख