मैत्री बंध
- हृदयनाथ किणी, वसई
वसई तालुक्यातल्या जुचंद्र येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातल्या एसएससी बॅच १९९६-९७ साठी १७ जून हा दिवस खरोखरच संस्मरणीय ठरला. दहावीपर्यंतचं शिक्षण एकत्र पूर्ण केल्यानंतर जवळपास २१ वर्षांनी सर्व मित्र-मैत्रिणींना एकत्र आणण्याची संकल्पना मनिषा बोरकर, जोस्त्ना पाटील व संदिप मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी मांडली. त्या संकल्पनेतून एसएससी बॅच १९९६-९७ या व्हॉट्सअॅप ग्रुपची सुरुवात करण्यात आली. याच ग्रुपच्या माध्यमातून आमच्या बॅचचं स्नेहसंमेलन व स्नेहभोजनाचा सोहळा पार पडला.
२१ वर्षांनंतर पुन्हा त्याच सर्व आठवणी घेऊन आम्ही सर्व वाकिपाडा गावातल्या चक्रवर्ती फार्म हाऊसमध्ये जमलो. फार्महाऊसवर राजेश पाटील व अमित म्हात्रे यांनी कार्यक्रमाची तयारी केली होती. आपापल्या सहमित्रांना, मैत्रिणींना भेटण्याची आतुरता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. याच आतुरतेतून जवळपास चाळीसच्या वर मित्र-मैत्रिणी या कार्यक्रमात सहभागी झाले. अत्यंत उत्साहात आणि मैत्रीपूर्ण वातावरणात हा सोहळा रंगला. वातावरणात मैत्रीचा सुगंध पसरवण्यासाठी व उत्साह वाढवण्यासाठी आमचा मित्र दयाराज पाटील डिजे साऊंडसहित तयार होताच.
प्रथम २१ वर्षांनंतर एकत्र आल्यामुळे बॅचच्या नावाचा केक कापून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. त्यानंतर स्मिता पाटीलनं मैत्री या विषयावर तयार केलेली तिची कविता वाचून दाखवली. शाळेच्या जीवनातील आठवणी जाग्या करणाऱ्या अनेक जुन्या गोष्टी मित्र-मैत्रिणींच्या समोर उघडण्यास सुरूवात झाली. त्यातून मनोरंजन आणि आनंदाची आगळीवेगळी पर्वणीच सुरू झाली. शाळेत केलेली दंगामस्ती पुन्हा नव्याने अनुभवायला मिळू लागली. शाळेत कोण कितव्या बाकावर बसायचं, त्याला मित्र-मैत्रिणी कोणत्या टोपणनावाने हाक मारायचे, कोणते सर कोणता विषय शिकवायचे, कोणते सर आवडते होते, कोण जास्त दंगामस्ती करायचे, कोण अभ्यासामध्ये हुशार होते अशा एक ना अनेक आठवणींनी विस्मृतीत गेलेले क्षण पुन्हा जिवंत झाले. वेळ संपेल पण आठवणी संपणार नाहीत याची प्रचिती येत होती. जुने सखे-सोबती एकत्र येण्याने या कार्यक्रमास एक वेगळीच रंगत चढत गेली. काही हौशी मित्र मैत्रिणींचा उत्साह तर अगदी शिगेला पोहोचला होता. सर्वांनी ह्या आनंदी क्षणांचे खूप फोटो, सेल्फी आपापल्या मोबाइलमध्ये काढून घेतले.
दुपारी स्नेहभोजनाअगोदर डिजेच्या तालावर सर्व मित्र-मैत्रिणी अगदी लहान होऊन नाचू लागले. जतीन म्हात्रे, प्रफुल्ल किणी, संदिप मोरे, कुंदन पाटील यांनी त्यांचे नृत्यगुण सर्वांसमोर सादर केले. त्यानंतर एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद घेण्यात आला. खरं म्हणजे असं स्नेहसंमेलन व स्नेहभोजनाचे कार्यक्रम प्रतिवर्षी होणं गरजेचं आहे. जे मित्र-मैत्रिणी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत त्या सर्वांना सहभागी करून पुढील वर्षी एकत्रित स्नेहसंमेलन व स्नेहभोजन आयोजित करून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.