मैत्री-बंध- स्नेहमिलनाचा आनंद
रघुनाथ शेट्ये
आमची मैत्री ऑफिसपासूनची म्हणजे चार दशकांपासूनची आहे. आम्ही सर्वजण भारतीय नौदलात कार्यरत होतो. नोकरीमुळे सुरु झालेली ही मैत्री आज आम्ही सेवानिवृत्त झाल्यावरही कायम आहे. निवृत्त झाल्यावर माजी सहकाऱ्यांची साधी विचारपूसही न करणारी काही मंडळी असतात, परंतु आमच्या ग्रुपनं मात्र निवृत्त सहकाऱ्यांना वर्षातून एक- दोनदा एकत्र आणून स्नेहमिलनाचा वसा आजतागायत कायम ठेवला आहे. कधी अलिबाग तर कधी लोणावळा येथे आम्ही बस करून जात असतो. एकमेकांच्या सहवासात आनंदानं दोन दिवस घालवतो आणि मरगळ झटकून पुन्हा नव्यानं आयुष्याला सामोरं जातो. आमच्या मित्रपरिवारात म्हणजे मधुकर पारकर, रघुनाथ शेट्ये, रमेश सावंत, मोहन कोळी, मोहन नाईक, बिरबल शिरसाट, होंडावडेकर, बाळ ठाकूर, शेडगे, भोगटे, आलंवे, यशवंत मोरे, आप्पा माळकर, रेडीज, यशवंत प्रधान, वाडकर, कुडवा, इस्माईल, कोरगावकर, अंजारा, विनायक चव्हाण, नारकर, अनंत खांदारे, बोराडे, धनावडे, माझगावकर या सगळ्या मंडळींचा समावेश आहे. अधूनमधून काही आजी-माजी सहकारी आमच्यासोबत येत असतात. डिसेंबरमध्ये माझा आणि मोहन नाईक यांचा ७५वा वाढदिवस अलिबागमधील मांडावा येथे साजरी केला. प्रथम हयात नसलेल्या मित्रांना म्हणजेच मधुकर पावसकर, सदा दुधावडकर आणि मोरू सावंत याना श्रद्धांजली वाहिली. मी आणि मोहन यांच्या प्रती असलेल्या भावना सगळ्यांनी आपल्या मनोगताद्वारे मांडल्या. कार्यक्रमाला उपस्थित राहून सगळ्यांनी मनमुराद आनंद लुटला. यापुढे ही अशीच आम्हा सर्वांच्या मनात एकमेकांना भेटण्याची ओढ कायम राहो हीच प्रार्थना.