शरयू काळे, सानपाडा आमचा १५ मैत्रीणींचा ग्रूप आहे. आम्ही सगळ्याजणी मराठी बोलणाऱ्या आहोत. त्यामुळे गप्पांना खूप उधाण येतं. आम्ही कुठल्याही विषयावर मनसोक्त बोलतो. रोज संध्याकाळी फिरून आल्यानंतर ६.३० च्या दरम्यान सगळ्यांची पाऊलं कट्ट्याकडे वळतात. आठ वाजेपर्यंत आमचा मुक्काम तेथेच असतो. सर्वजणी ६०- ७० वर्षं वयोगटाच्या आहोत. बहुतेक सर्वांची मुलं परदेशात अथवा बाहेर गावी आहेत. त्यामुळे घरी राहणारे दोघंच असतात. आम्ही सर्वांचे वाढदिवस चॉकलेट किंवा केक देऊन कट्ट्यावर साजरे करतो. हळदी-कुंकवासारखे कार्यक्रम पण तिथेच होतात. त्यामुळे बरेच दिवस तिळगुळ खायला मिळतो. तसंच आंब्याच्या दिवसांत आंबा डाळ खावयास मिळते. आमच्यापैकी बऱ्याचजणी चतुर्थी करणाऱ्या आहेत. त्यामुळे सिद्धीविनायकाच्या प्रसादाचा लाभ होतो. काही मैत्रीणी तिरुपती, शिर्डी किंवा दुसऱ्या देवस्थानाला जाऊन आल्यास तिथल्याही प्रसादाचा लाभ मिळतो. परदेशात जाऊन आलेल्या मैत्रीणी तेथील चॉकलेट्स किंवा छोट्या भेटवस्तू आणतात. त्याचाही आम्ही आनंद घेतो. कधी-कधी कोणी मैत्रीण एखादा पदार्थ घेऊन येते आणि आम्ही सर्व मिळून त्याचा आस्वाद घेतो. गप्पा कट्ट्या बरोबर तो एक खाऊ कट्टा पण बनलाय. पदार्थ आले की, त्याच्या रेसिपी पण मिळतात आणि टीप्स ही मिळतात. बऱ्याच जणींना सुना, नातवंड आहेत. त्यांचं डोहाळजेवण, बारसं, जावळ अशा कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या घरी जाणं होतं. अधून-मधून आमचे गेटटुगेदर सुरू असते. आमच्या कट्ट्याचा मुख्य उद्देश म्हणजे अडीअडचणींना एकमेकांना मदत करणं, संध्याकाळचा वेळ आनंदात घालवणं हा आहे. ‘एकमेंका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ हे आमचं तत्व आहे. हा कट्टा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. त्याची आम्हाला सवय लागली आहे. काही कारणाने बाहेर जावं लागलं तर उशीर होतो. पण थकल्यावर ही पाच मिनिटं तरी कट्ट्यावर गेल्याशिवाय चैन पडत नाही. या कट्ट्यामुळे आम्हाला खूप आनंद मिळतो. म्हणून आम्ही या कट्ट्याचे नाव 'आनंदी कट्टा' असं ठेवलं आहे.
उतारवयातील आनंदी कट्टा
आठ वाजेपर्यंत आमचा मुक्काम तेथेच असतो. सर्वजणी ६०- ७० वर्षं वयोगटाच्या आहोत. बहुतेक सर्वांची मुलं परदेशात अथवा बाहेर गावी आहेत. त्यामुळे घरी राहणारे दोघंच असतात. आम्ही सर्वांचे वाढदिवस चॉकलेट किंवा केक देऊन कट्ट्यावर साजरे करतो. हळदी-कुंकवासारखे कार्यक्रम पण तिथेच होतात. त्यामुळे बरेच दिवस तिळगुळ खायला मिळतो. तसंच आंब्याच्या दिवसांत आंबा डाळ खावयास मिळते. आमच्यापैकी बऱ्याचजणी चतुर्थी करणाऱ्या आहेत. त्यामुळे सिद्धीविनायकाच्या प्रसादाचा लाभ होतो. काही मैत्रीणी तिरुपती, शिर्डी किंवा दुसऱ्या देवस्थानाला जाऊन आल्यास तिथल्याही प्रसादाचा लाभ मिळतो.
Maharashtra Times 31 May 2016, 12:12 am