रवींद्र देशमुख (काटीकर)
माझं मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील काटी. सध्या सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या फोटोवर जाऊ नका, छोटा दिसत असलो तरी सेवेची २५ आणि वयाची ४६ वर्षं पूर्ण केली आहेत. घरच्या गरीब परिस्थितीमुळे आणि नोकरी लागताच वडिलांना आलेल्या अंधत्वामुळे वयाच्या २०-२१व्या वर्षी छोट्या बहिणीच्या लग्नाची, घराची सारी जबाबदारी भाऊ नसल्यामुळे माझ्यावर आली.
मोठ्या दोन बहिणींची लग्न झाली होती. त्यांचीही परिस्थिती फारशी बरी नव्हती. तशी नात्याची बरीच माणसं होती; पण दुरूनच. मला नात्यांची फारशी माहिती नव्हती. बहिणीसाठी स्थळं कशी शोधणार? मला राहायला घर नव्हतं. सारं शिक्षण पत्र्याच्या खोलीत गेलं. लग्न करायचं म्हटलं, तर घर तरी हवं, म्हणून प्रथम घर बांधलं. बहिणीसाठी स्थळाची खूप शोधाशोध झाली. तिचं लग्न जमलं. ही वार्ता समजताच माझ्यासाठी विचारणा होऊ लागली. मी पक्कं ठरवलं होतं, की आपल्या वैयक्तिक गरजा व अपेक्षा फार कमी आहेत. कौटुंबिक स्वास्थ्याला झुकतं माप देत मी माझी जोडीदार गृहिणी असावी, असं ठरवलं.
मी व्यवसाय निवडला. आमची वडिलोपार्जित १८ एकर जमीन होती; पण ज्वारी विकत घ्यावी लागायची. पडीक जमीन पिकाखाली आणली. प्रचंड आत्मविश्वासपूर्वक अहोरात्र परिश्रम केले. सोनललाही सांगीतलं, ‘तू आपल्या शेतात काम केलं नाहीस, तर कोण्या शेजाऱ्याची बायको येवून करणार का?’ तिनंही अत्यंत विश्वासानं ज्वारी काढणं, खुपरपणं, चघळ वेचणं, बाजरी खुडणं, तुरी कापणं, कांदा, ऊस लागण करणं, सोयाबीन, हरभरा, गहू काढणं, कापणं भरडणं, जरशी गाईची काळजी घेणं या साऱ्या कामांत मला खूप मदत केली. आई, वडील, छोटी मुलं, नातीगोती सारं तिनं त्याचवेळी सांभाळलं. तुमचा विश्वास बसणारही नाही. कदाचित तिनं माहेरी शेतात कामही केलं नव्हतं. इथे तिनं केवळ अंगमेहनतच केली नाही, तर माझ्या प्रयोगशीलतेमुळं नेहमीच तोट्यात येणाऱ्या व्यवहारातही लाख मोलाचा धीर दिला. मी जिल्हा परिषद शाळेचा शिक्षकही होतो. आयुष्यात कधी पान, सुपारी खाल्ली नाही. व्याजानं पैसे काढायची वेळ मात्र यायची. तिनं प्रत्येकवेळी मला आधार दिला.
वडिलांना अंधपणा येऊन २० वर्षं होत आली होती. एका ठिकाणी बसून त्यांची चिडचिड वाढली. पुढे ती मनोरुग्णतेकडे गेली. दोन मुली, एक मुलगा, आई असा मोठा परिवार होता. बरोबर आले-गेले होते. शेत हिरवंगार असायचं; पण खिसा कायम रिकामा. या साऱ्याचा तिला किती त्रास होत असेल, याचा साधा विचारही मनाला शिवला नाही. उलट मीच ओढाताणीमुळं कधी कधी चिडायचो. स्वतःलाच दूषण द्यायचो. तेव्हा, ‘जाऊ द्या. तुमच्या खिशात पैसे नसले म्हणून काय झालं. पडीक शेताचं मळ्यात रूपांतर झालं. विहीर, बोअर, पाइपलाइन, द्राक्षबाग, फौंडेशनचं घर, शेतघराचं काम, स्प्रिंकलरपासून कडबाकुट्टीपर्यंत, गाई, गुरं, बैल इतकं सारं वैभव उभं केलंत. हे कमी आहे का? सर एक दिवस तुमचाही येईल. गावात लोक तुमच्या शेतीची चर्चा करतील.’ तसंच झालं. एके वर्षी सफरचंद ४० रुपये किलो होते, त्यावर्षी माझा कांदा ४,८०० रुपये क्विंटलनं विकला होता. हैदराबाद, बेंगळुरू, सोलापूर इथे ट्रक भरून कांदा विक्रीसाठी गेला. तेव्हा तिनं विचारलं, ‘काय सर, आता कसं वाटतंय?’ तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी यायचंच बाकी होतं.
माझी बदली झाली. सोलापूरला राहायला आलो. वडिलांची अवस्था बघून घर भाड्यानं मिळत नव्हतं. त्याचवेळी मी उस्मानाबादला बी.एड. करत होतो. घर मिळत नव्हतं, हे होतंच. शेवटी एक घर मिळालं. आम्ही १५ दिवसांत तिथे राहायला जाणार होतो. तोच चमत्कार झाल्यासारखा एक व्यवहार झाला आणि आम्ही स्वतःचा दोन बेडरूमचा फ्लॅट घेतला. आम्ही नव्या घरी राहायला गेलो, त्या दिवशी वडील शांतपणे झोपले. पुढे २० दिवसांत त्यांनी जगाचा निरोप घेतला. तळहाताच्या फोडाप्रमाणं मुलांना सांभाळणारे मातापिता खूप पाहिले आहेत. त्यापेक्षाही अधिक काळजी अगदी लहान मुलाप्रमाणं सासऱ्यांना सांभाळणारी सून सापडणं अवघड आहे. माझी पत्नी, स्नेहल एक आदर्श उदाहरण बनली. आबा गेले आणि साऱ्या गावात एकच विषय होता, लेकीपेक्षाही जास्त जीव सुनेनं लावला. आबांना सून असूनही ती त्यांची माय झाली होती. आज मी फक्त नोकरी करतो. मुलांची शिक्षणं छान चालू आहेत. हे सारं घडलं फक्त तिच्या खंबीर, पोलादी साथीमुळे. आता तुम्हीच सांगा, शक्य आहे तिचा विसर होणं? तिचं माझ्यापासून थोडंही दूर जाणं. आता जरा स्पष्टच सांगतो, ‘नसतेस घरी तू जेव्हा, उर माझा फाटतो, निःशब्द होते मन आणि श्वास माझा कोंडतो,’ खरंच आता वेळ माझी आहे. खूप खूप सुख देईन. परतफेड करू शकणार नाही; पण आता तिच्यासाठी जगत राहीन.