अ‍ॅपशहर

प्रवासादरम्यान जुळली मनं

वेगवेगळ्या निमित्तानं आपण अनेकांना भेटत असतो. त्यातील काहींशी आपले सूरही जुळतात आणि त्यांच्यासोबतचे आपले हे स्नेहाचे बंध इतके घट्ट होतात, की नकळत ते आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनतात. असाच काहीसा सुंदर अनुभव माझ्या आयुष्यातही आला आहे.

Maharashtra Times 19 Apr 2018, 11:46 am
संजय शेट्ये, बोरिवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maitri-bandh


वेगवेगळ्या निमित्तानं आपण अनेकांना भेटत असतो. त्यातील काहींशी आपले सूरही जुळतात आणि त्यांच्यासोबतचे आपले हे स्नेहाचे बंध इतके घट्ट होतात, की नकळत ते आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनतात. असाच काहीसा सुंदर अनुभव माझ्या आयुष्यातही आला आहे. २००२मध्ये मी सहारा इंडियामध्ये कामाला होतो. ऑफिस वांद्रे येथे असल्यामुळे दहिसर ते वांद्रे प्रवास मी खासगी बसनं करत असे. यावेळी माझ्यासोबत इतर ऑफिसेसमधीलही काही सहकारी असायचे. रोजच्या दीड तासांच्या या प्रवासात आमची मैत्री घट्ट झाली होती. प्रत्येकाविषयी प्रेम व जिव्हाळा भरभरून होता. या प्रवासात गप्पा, विचारांची देवाणघेवाण तर होतीच शिवाय आणखी एक विरंगुळा होता तो म्हणजे भजन मैफल. ज्ञानेश्वर खांबे, दिगंबर निर्गुण, सुनील प्रभू, प्रकाश सावंत, मोहन राणे, विलास परब यांच्या एकाहून एक सरस व श्रवणीय भजनांनी बसमधील वातावरण अगदी भारावून जात असे. सगळेच या भजनात तल्लीन होत असत. तेव्हापासूनच मला भजनाची गोडी निर्माण झाली. आमची ही भजन मैफल रोज रंगत असे आणि त्यामुळेच आमच्या दिवसाची सुरुवातही अतिशय उल्हासित होत असे.

काही काळाने मी दुसऱ्या ऑफिसमध्ये रुजू झालो. पण आमची मैत्री मात्र कायम राहिली. आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतोच. २०१० मध्ये आमच्या घरी स्वामी समर्थांची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून आमच्या घरी स्वामी जयंती अगदी उत्साहात साजरी केली जाते. स्वामी समर्थ जयंती कोणत्याही दिवशी आली तरीही दूरदूरहून भक्त दर्शनासाठी येतातच. या छोटेखानी सोहळ्यात भजनाचा खास कार्यक्रमही असतो, तोही बसमधील माझ्या भजनी मंडळाचा. कामात कितीही व्यस्त असले तरी हे भजनी मंडळ स्वामी जयंतीचा दिवस माझ्यासाठी राखूनच ठेवतात. दिवसागणिक वाढत जाणारी भक्तांची संख्या आणि जागेअभावी ही भजनाची मैफल गेल्या चार वर्षांपासून माझे शेजारी आणि मित्र सुनील बुधकर यांच्या घरी रंगते. दोन ते अडीच तास सुरु असणाऱ्या या मंत्रमुग्ध भजनानं वातावरण अगदी भक्तिमय होतं. या सर्वाला साथ असते ती कश्यप खांबे यांच्या सुरेल बासरीवादनाची आणि विनय निर्गुण यांच्या पेटीची. या श्रवणीय भजनाची अनुभूती घेतल्यानांतर, पुढच्या स्वामी जयंतीलाही नक्की येऊ, असं सांगून तृप्त मनानं भक्त घरी जातात. रोजच्या प्रवासात सुरु झालेली ही मैत्री आज माझ्या आयुष्यातील एक भाग बनली आहे. हे बंध कायम असेच राहावेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज