अ‍ॅपशहर

समाधानी आयुष्याचं रहस्

माझं लग्न १९९६ मध्ये झालं. लग्नानंतर मी विरारहून कांदिवली येथे रहायला गेले. नोकरीनिमित्त मला कांदिवलीहून अणूशक्तीनगरपर्यंत रोज ये-जा करावी लागे. पहाटे ३.४५ ला उठून सर्वांसाठी भाजी-पोळी बनवून ५.५०ला घर सोडून मी ८ वाजता नोकरीत हजर रहात असे. १९९७ मध्ये एके दिवशी अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणी साठलं होतं. आम्ही स्टाफ बसमधून ४.३०ला निघालो पण चुनाभट्टीपासून बस जी रखडत- रखडत निघाली ते अंधेरी येथे जाईपर्यंत दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली.

Maharashtra Times 31 Jan 2017, 12:25 am
नीलिमा भोईर, अणूशक्तीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम my love my kids
समाधानी आयुष्याचं रहस्


माझं लग्न १९९६ मध्ये झालं. लग्नानंतर मी विरारहून कांदिवली येथे रहायला गेले. नोकरीनिमित्त मला कांदिवलीहून अणूशक्तीनगरपर्यंत रोज ये-जा करावी लागे. पहाटे ३.४५ ला उठून सर्वांसाठी भाजी-पोळी बनवून ५.५०ला घर सोडून मी ८ वाजता नोकरीत हजर रहात असे. १९९७ मध्ये एके दिवशी अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणी साठलं होतं. आम्ही स्टाफ बसमधून ४.३०ला निघालो पण चुनाभट्टीपासून बस जी रखडत- रखडत निघाली ते अंधेरी येथे जाईपर्यंत दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली. तब्बल १२-१३ तास बसून, काहीही न खाता-पिता केवळ वाट पाहत बसावं लागलं होतं. देवाच्या कृपेने मला कन्यारत्न प्राप्त झालं तेही सुखरूपपणे.
माझी लेक सहा महिन्यांची झाल्यावर तिला सांभाळण्याचा प्रश्न होता, तेव्हा माझ्या आई-वडीलांनी पुढाकार घेऊन तो प्रश्न मिटवला. पण मला दर शुक्रवारी तिला ऑफिसमधून निघून विरारला जाऊन कांदिवलीला घेऊन यावं लागे. शिवाय मग दर रविवारी मी आणि माझे पती तिला पुन्हा विरारला सोडून, रात्री उशिरापर्यंत घरी येऊन दुसऱ्या दिवशी कामावर जात असू. माझी लेक चार वर्षांची झाल्यावर ज्या वेळेस मी पुन्हा गरोदर राहिले तेव्हा मात्र मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आम्ही माझ्या अणूशक्तीनगर येथील क्वार्टर्समध्ये राहावयास आलो.
पती नोकरीनिमित्त त्यावेळेस बडोदा आणि त्यानंतर कोपरगाव येथे होते. माझा मुलगा चार वर्षांचा असताना पुन्हा त्यांची बदली अक्कलकोट येथे सव्वातीन वर्षांसाठी झाली. त्याच दरम्यान एका मागोमाग एक अशी दोनही मुलांना कावीळ झाली. त्यांच्या गावठी उपचारासाठी धावपळ करून ऑफिस सांभाळावं लागे. त्याकाळात मला बेबीसीटरची मात्र चांगली साथ लाभली. लागोलागच माझ्या पायाचा अंगठा फ्रॅक्चर झाला. एका मागोमाग एक अशी संकटं उभीच असत. पण मी आजपर्यंत सर्व सांभाळत आले. शिवाय हौस म्हणून माझी नृत्याची, लिखाणाची कलाही जपली ती केवळ पतीच्या खंबीर पाठिंब्यामुळेच. आज माझी मुलगी इंजीनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असून मुलगा नववीत शिकत आहे. आजही माझे पती धुळे येथील दोंडाईचा येथे कामानिमित्त असतात. पण एकमेकांवरील विश्वासावर आणि त्यांच्या खंबीर पाठिंब्यावर एक समाधानी आयुष्य मला जगता आलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज