अरुण महिषी, नेरूळ हिंदी चित्रपटसृष्टचं जेव्हा बॉलीवूडमध्ये रुपांतर झालं नव्हतं तेव्हा हिंदी रुपेरी पडद्यावर वावरणारा सुपरहिरो म्हणजे खऱ्या अर्थाने नटसम्राट असणारा दिलीप कुमार. आपल्या सिने कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारा दिलीप कुमार म्हणजे अभिनयाचे विद्यापीठ होते. या महान कलावंताचा १९७० साली प्रदर्शित झालेला 'गोपी' हा चित्रपट मनाला खूपच भावला. या चित्रपटातील 'सुख के सब साथी दुख में ना कोई' हे शाश्वत जीवनाचे सार सांगणारे गीत हे माझ्या मनात कायमस्वरूपी रुंजी घालणारं गाणं आहे. गीतकार राजेंद्रकृष्ण यांचे जीवनाच्या अंतिम सत्यावर यथायोग्य भाष्य करणारे सुरेख शब्द आणि त्याला संगीतबद्ध करणारे चतुरस्त्र संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचे श्रवणीय संगीत यांचा मिलाफ म्हणजे हे गाणं आहे. दिग्दर्शक भीमसिंग यांच्या दिग्दर्शनाखाली दिलीप कुमार यांनी हे गाणं पडद्यावर अत्यंत दमदारपणे पण सहजगत्या साकारलं आहे. सुख के सब साथी, दुःख में ना कोई मेरे राम, तेरा नाम एक साचा दूजा ना कोई सुख असेल तेव्हा सर्वजण सोबत असतात. दु:खामध्ये मात्र कोणीही येत नाही. हे राम तुझ्या नामाशिवाय दुसरं काहीही नाही. जीवन आनी जानी छाया, झूठी माया, झूठी काया फिर काहे को सारी उमरियाँ पाप की गठडी ढोई ना कुछ तेरा, ना कुछ मेरा, ये जग जोगीवाला फेरा राजा हो या रंक सभी का अंत एक सा होई जीवनामध्ये माणूस येतो-जातो. पण हे जग अभासी आहे. तरीही मनुष्य सर्व आयुष्भर पाप करत जातो. गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही. सर्वांचा अंत एक सारखा ठरलेला आहे. बाहर की तू माटी फांके, मन के भीतर क्यों ना झांके उजले तन पर मान किया और मन की मैल ना धोई माणूस शरीराची बाहेरुन स्वच्छता करतो. पण मनामध्ये साठलेला मळ त्याला दिसत नाही. म्हणून आपलं मन प्रथम स्वछ केलं पाहिजे. असा जीवनसार असलेला मौलिक संदेश या गीतामधून आपल्याला मिळातो. असं हे सर्वांग सुंदर गीत माझ्या मनात निरंतर घर करून राहिलं आहे.
जीवनाचं सार सांगणारं गीत
'सुख के सब साथी दुख में ना कोई' हे शाश्वत जीवनाचे सार सांगणारे गीत हे माझ्या मनात कायमस्वरूपी रुंजी घालणारं गाणं आहे. गीतकार राजेंद्रकृष्ण यांचे जीवनाच्या अंतिम सत्यावर यथायोग्य भाष्य करणारे सुरेख शब्द आणि त्याला संगीतबद्ध करणारे चतुरस्त्र संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचे श्रवणीय संगीत यांचा मिलाफ म्हणजे हे गाणं आहे. दिग्दर्शक भीमसिंग यांच्या दिग्दर्शनाखाली दिलीप कुमार यांनी हे गाणं पडद्यावर अत्यंत दमदारपणे पण सहजगत्या साकारलं आहे.
Maharashtra Times 31 Mar 2016, 12:12 am