अमिता गुप्ते, गोरेगाव
पावसाच्या सरींवर सरी कोसळत असतात, भर दुपारीच संध्याकाळ दाटून आलेली असते. अशा कुंद वातावरणात माझ्या मनांत घर करून असलेलं हे गाणं ओठांवर येतं
अब के बरस भेज भैया को बाबुल, सावन ने लीजो बुलाय रे
लौटेंगी जब मेरे बचपन की सखीयां, देजो संदेसा भिजाय रे
बिमल रॉय यांच्या १९६३ साली आलेल्या 'बंदिनी' या चित्रपटातील हे नितांत सुंदर गीत. हा चित्रपट तर अप्रतिम आहेच. शिवाय शैलेंद्रचे हृदयस्पर्शी शब्द, एस. डी. बर्मनचं हळुवार संगीत आणि कळस म्हणजे आशा भोसलेंचा मधाळ आणि तितकाच व्याकूळ स्वर. आशाताई हे गाण अक्षरशः जगल्या आहेत.
चित्रपटाची नायिका आहे कसदार अभिनेत्री नूतन. पण हे गाणं चित्रित झालं आहे एका सहाय्यक अभिनेत्रीवर. तुरुंगाच्या पार्श्वभूमीवर जात्यावर दळण दळताना गात असणारी ती स्त्री आणि हे गाणं विषण्णपणे ऐकणाऱ्या इतर महिला कैदी. हे इतकंच दृश्य तरीही पडद्यावरून नजर हटत नाही.
अम्बुवा तले फिर से झूले पडेंगे, रिमझिम पडेंगी फुहारें
लौटेंगी फिर तेरे आंगन में बाबुल, सावन की ठंडी बहारें
छलके नयन मोरा कसके रे जियरा, बचपन की जब याद आए रे
आशाताईंचे आर्त स्वर मला अलगद माझ्या बालपणीच्या काळात घेऊन जातात. लहानपणी अंगणात, पावसांत केलेली दंगामस्ती आठवते आणि मन हळवं होऊन जातं. काळ बदलला, संदर्भ बदलले तरीही वेदना चिरंतन राहते. काळजाला हात घालणारं हे गाणं कोणाही प्रौढ संसारी स्त्रीला आजही एखाद्या नवख्या सासुरवाशिणीप्रमाणे माहेरच्या आठवणीने व्याकूळ करतं.
बैरन जवानी ने चीने खिलौने,
और मेरी गुडिया चुराई
बाबुल की मैं तेरे नाजों की पाली, फिर क्यों हुई मैं पराई
बीते रे जुग कोई चिठिया न पाती,
न कोई नैहर से आये, रे
अब के बरस भेज भैय्को बाबुल...