अमित देवळेकर, कांदिवली
नुकतंच घरच्यांसोबत श्रीनगरला फिरायला गेलो होतो. ठरल्याप्रमाणे दल तलावात शिकारात बसून 'चारचिनार' बेट पाहायचा बेत होता. आई-बाबा एका शिकारात आणि मी, सोनल, अद्वैत आणि अनय दुसऱ्या शिकारात होतो. गंमत म्हणजे प्रत्येक शिकाराला हिंदी चित्रपटाची नावं देण्यात आली होती. शिकारातून फिरताना फ्लोटिंग मार्केटचा अनुभव आला. थोड्या-थोड्या अंतरावर शिकारातून काही जण शोभेच्या वस्तू, फोटो आणि स्नॅक्स वगैरे खरेदीसाठी विचारत होते. मी अशा खरेदीपासून थोडा सावध होतो. कारण फसवणूक होते असं ऐकलं होतं. प्रत्येक जण शिकाराला घेराव घालून काहीतरी घ्यावं यासाठी विचारणा करत होते. आम्ही काही वस्तू घेत नाही हे लक्षात येताच आमच्या शिकाराचा चालक काश्मिरी भाषेत इतर स्थानिक लोकांना बहुतेक इथे काही जमत नाही असं सांगत होता किंवा असावा.
संथ गतीनं शिकारा चारचिनार बेटाकडे जात होती. त्यात आमचा व्हल्लेकरी मध्येच एखाद-दुसरा मराठी शब्द उच्चारत होता. मध्येच त्यानं 'वल्लव्ह रे नाखवा रे वल्लव्ह' गाण्याचे बोल पुटपुटले. आम्हाला ही छान वाटलं. तलावात सर्वत्र पाणझुडूप वाढलेली दिसत होती. त्यातील काही व्हाइट लीली फुलाची आणि काही कमळाची आहेत, असं त्यानं सांगितलं. तलावात हाऊस बोट ही होत्या, त्याचीही माहिती त्यानं दिली. एव्हाना आमची बऱ्यापैकी शिकारा चालकासोबत गट्टी जमली होती. तो ही आमच्यासोबत गप्पा मारत होता. आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होता. अगदी सहज मी 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे गीत गायलं आणि काश्मिरी बोल येत नसल्यानं शब्द न उच्चारता फक्त गुणगुणलो. मला बोल येत नसल्याचं पाहून शिकारा चालकानं लगेचच ते गाणं गायला सुरुवात केली आणि त्याचा अर्थ काय हेही सांगितलं. ज्या भावनेनं त्यानं अर्थ सांगितला किंवा प्रयत्न केला ते ऐकून आनंद झाला. चारचिनार पाहून काश्मिरी पेहरावात फोटो काढून आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलच्या दिशेनं रवाना झालो.