पासच्या नावाखाली फसवाफसवी
विष्णु बापट, अलिबाग
ही गोष्ट १९९८ची आहे. आम्ही दरवर्षी सहकुटुंब ट्रीपला जात असतो. त्यावर्षी आम्ही दिल्ली, आग्रा आणि हरिद्वार जायचं ठरवलं होतं. एका एजंटमार्फत तिकीट बुक केलं. ते ऑगस्ट क्रांती ट्रेनचं होतं. ट्रेन सुरु झाल्यावर वेटर पाण्याची बाटली व नाश्ता घेऊन आला. आम्ही नको म्हटलं तेव्हा तो हसला आणि म्हणाला, 'भाईसाब ये मुफ्त है'. जसं निझामुद्दीन स्टेशन जवळ आलं तसे काही लोक माझ्याजवळ आले आणि म्हणाले, 'साब टॅक्सी और हॉटेल चाहीए क्या? सस्ते में दिलवादेंगे'. त्यांच्यापैकी एकजण टॅक्सी करता फारच आग्रह करु लागल्यानं त्याला 'हो, चल' असं म्हटलं आणि स्टेशनवर त्याने आमचं सामान घेतलं.
स्टेशन बाहेर पडताना त्यानं विचारलं की, 'साब आप टुरिस्ट हो?'. मी म्हटले 'हो'. त्यावर तो म्हणाला, 'जल्दी करो आपको मै टुरिस्ट पास निकाल के देता हूं'. मी म्हटलं 'कशाला' तर तो म्हणाला 'अगर आपके पास टुरिस्ट पास नाही होगा तो आपको कोइ हॉटल में रुम नहीं मिलेगा'. ते ऐकून मी आश्चर्यचकीत झालो आणि म्हणालो, 'हमने तो ये कभी नही सुना की ऐसा कोई पास लागता है'. त्यावर तो म्हणाला, 'हा साब आजकल आतंकवादी को रोकने के वास्ते ये बनाया गया है'. मी म्हटलं, 'मैं यकीन नही करता' तर तो म्हणाला 'साब पास फुकटमें मिलता है'.
टॅक्सीवाल्यानं आम्हाला स्टेशनबाहेरच्या एका टुरिस्ट सेंटरमध्ये नेलं. तिथं तर चित्र उलटंच पाहायला मिळालं. तिथं गेल्या-गेल्या तेथील एजंट त्या पासबद्दल न बोलता स्वस्तात रुम बुक करून देतो, असं म्हणू लागला. मी त्याला स्पष्ट नकार दिला. त्याउपर तो मला म्हणाला, 'मग आम्ही तुम्हाला टुरिस्ट पास देणार नाही आणि मग तुम्हाला कोणताही हॉटेलमध्ये रुम मिळणार नाही'. त्यांची लबाडी माझ्या लक्षात आल्याबरोबर मी त्याला म्हटलं 'चलेगा'. मग आम्ही ज्या टॅक्सीनं आलो तो टॅक्सीवाला म्हणाला की, 'जर तुम्ही पास काढला नाही तर मीसुद्धा तुम्हाला घेऊन जाणार नाही'. एव्हाना मला रॅकेट लक्षात आलं. मी त्याक्षणी माझं सामान घेऊन तिथून बाहेर पडलो आणि पहाडगंजला आलो. मी नेहमी दिल्लीला जाणाऱ्या माझ्या मित्रांना ही घटना सांगून सावध करतो व बरेच जण मला आल्यावर सांगतात की, तुम्ही सावध केल्यानं आम्ही वाचलो.